Download App

“पाच वर्षांत साधं नाट्यगृह सुरू करता आलं नाही” कोल्हेंच्या आरोपांना उत्तरे देत अक्षय आढळरावांचा प्रहार

आपण चांगले कलाकार आहात. अभिनेते आहात. आपल्या वचननाम्यात आपण मतदारसंघात चित्रपटसृष्टीची घोषणा केली होती. चित्रपटसृष्टी राहू द्या पाच वर्षात एखादं नाट्यगृह तरी सुरू केलं का?

Shirur Lok Sabha Election 2024 : शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना आहे. प्रचारात आरोप प्रत्यारोपांचा अँगल थोडा बदलला आहे. अमोल कोल्हे यांनी थेट आढळराव पाटील यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या कारभारावर प्रश्न विचारले. त्यामुळे मतदारसंघातील राजकारणाचा पारा चढला. कोल्हेंनी विचारलेले प्रश्न आणि आरोपांना स्वतः अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. तसेच कंपनीविरोधात पुरावे असतील तर समोर आणा सगळी उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत, असे आव्हान त्यांनी अमोल कोल्हेंना दिले.

आरोग्यासंदर्भात आढळरावांचे सर्वाधिक प्रश्न

अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आढळरावांनी संसदेत सर्वाधिक प्रश्न संरक्षण खात्याशी संबंधित विचारले असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला. खरंतर आढळरावांनी त्यांच्या दोन टर्मच्या काळात लोकसभेत एकूण २१८५ प्रश्न विचारले. यामध्ये डिफेन्ससंदर्भातील ६७ प्रश्नांचा समावेश आहे. सर्वाधिक १८२ प्रश्न आरोग्य आणि कुटुंब कल्याणासंदर्भात होते. मनुष्यबळासंदर्भात १५१ प्रश्न, रेल्वेसंदर्भात १४५ प्रश्न, शेतीसंदर्भात १४३ प्रश्न दहा वर्षांच्या काळात विचारले.

भारतातील संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची मालकी भारत सरकारकडे आहे. २०२३-२४ मध्ये भारताने विविध देशांना २२ हजार कोटींचे डिफेन्स एक्सपोर्ट केले आहे. त्याआधीच्या वर्षात हा १६ हजार कोटींचा होता. म्हणजेच एकाच वर्षात ३२ टक्के वाढ या क्षेत्रात झाली आहे.

शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांचं विधान अन् चर्चांना उधाण

डिफेन्स क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात आणि त्यातही आपल्या मतदारसंघात आहेत. या कंपन्यांत काम करणारे कर्मचारी देखील आपल्याच मतदारसंघातील आहेत. आपल्याला इतकं तरी ज्ञान असलं पाहिजे की ज्यावेळी या गोष्टींवर प्रश्न विचारले जातील. या कंपन्यांना चालना देण्यासाठी प्रश्न विचारले जात असतील तर त्याचा फायदा आपल्या मतदारसंघातील लोकांनाच होणार आहे.

कोल्हे साहेब, तुमची कीव करावीशी वाटते

हा प्रश्न विचारल्याने डायनालॉग या कंपनीला भरपूर फायदा झाला आहे असं जर आपल्याला (अमोल कोल्हे) वाटत असेल. संसदेत एखादा प्रश्न विचारल्याने डिफेन्स प्रॉक्युअरमेंट होऊ शकते असेही वाटत असेल तर आपली कीवच केली पाहिजे असं मला वाटतं.

भारत सरकारने रशियन कंपनी युनायटेड शिप बिल्डींग आणि भारतातील गोवा शिपयार्ड या कंपनीत काही करार झाला आहे का? या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन काही सबमरिन तयार करणार आहेत का? या गोष्टीमुळे भारतीय कंपन्यांना काही फायदा होणार आहे का? असेही प्रश्न विचारले होते.

मोठी बातमी : शिंदे सरकारला दिलासा; छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

पहिली गोष्ट म्हणजे गोवा शिपयार्ड कंपनी ही आढळराव पाटील कुटुंबियांची नाही. या कंपनीला काही काम मिळालं तर त्यातून येणारं उत्पन्न हे फक्त आणि फक्त गोवा शिपयार्ड ऑर्गनायजेशनला येणार आहे. एका बाजूला म्हणायचं उद्योग राज्य आणि देशाबाहेर जात आहे आणि दुसऱ्या बाजूला असे प्रश्न विचारायचे ज्याचा फायदा भारतीय कंपन्यांना होऊ शकतो. त्यातून एखाद्या खासगी कंपनीला कसा फायदा होऊ शकतो याचं उत्तर द्या असे आव्हान अक्षय पाटील यांनी कोल्हेंना दिले.

तुमच्या नेत्यांच्याही शिक्षण संस्था, आम्हीही तेच केलं

आमच्या कंपनीत अडीचशे ते तीनशे लोकं काम करतात आणि हे सगळ्या आपल्या मतदारसंघातील आहेत. विरोधक म्हणतात की दादांच्या (आढळराव पाटील) परदेशात कंपन्या आहेत. त्यांचे उद्योग व्यवसाय भारताच्या बाहेर आहेत. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. खरंतर मला आश्चर्य वाटतं आणि हसू सुद्धा येतं. उद्योग व्यवसाय करणं हा काय गुन्हा आहे का? तुम्ही म्हणता आमच्या शिक्षण संस्था आहेत. मग तुम्ही ज्या नेत्यांना (शरद पवार) मानता ज्यांचा आदर्श घेता त्यांनीही राज्यात शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत ना. आम्ही सुद्धा तेच केलंय. आमच्या शिक्षण संस्था या आमच्या मतदारसंघात आहेत. मग यात चूक काय?

पाच वर्षात एखादं नाट्यगृह तरी केलं का ?

आपण चांगले कलाकार आहात. अभिनेते आहात. आपल्या वचननाम्यात आपण मतदारसंघात चित्रपटसृष्टीची घोषणा केली होती. चित्रपटसृष्टी राहू द्या पाच वर्षात एखादं नाट्यगृह तरी सुरू केलं का? हे तु्म्हाला जमलं नाही पण दुसऱ्याच्या कर्तुत्वावर बोट कसं दाखवायचं हे आपल्याला जमतं अशी खोचक टीका अक्षय पाटील यांनी अमोल कोल्हेंवर केली.

follow us