Download App

Haryana Elections : हरियाणात काँग्रेस-भाजपसमोर नवं संकट; बंडखोरांनी दिलं ‘अपक्ष’ चॅलेंज!

Haryana Assembly Elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी (Haryana Assembly Elections) अर्ज भरण्याची अंतिम तारीख उलटून गेली आहे. काँग्रेस, भाजप आणि आम् आदमी पार्टीने राज्यातील सर्व 90 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. आता या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपसमोर वेगळच संकट उभ राहिलं आहे. तिकीट मिळाले नाही म्हणून किंवा काही अन्य कारणांनी पक्षावर नाराज असलेल्या नेत्यांनी बंडखोरी केली. या बंडखोरांनीच दोन्ही पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे.

भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर पक्षात जी बंडखोरी झाली होती त्यातून भाजप अजूनही सावरलेला नाही. काही नेत्यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत आम आदमी पार्टी आणि जेजेपीमध्ये प्रवेश केला तर काही जणांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. आजमितीस भाजपचे दहा आणि काँग्रेसच्या 23 बंडखोर (Congress Party) अपक्ष म्हणून निवडणूकीत उतरले आहेत. या उमेदवारांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची धाकधूक वाढवली आहे.

वेगवेगळ्या मतदारसंघातील 23 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस 10 भाजप नेत्यांनी पक्षपाती वर्तणुकीचा आरोप लावत अपक्ष किंवा अन्य पक्षाचा झेंडा हाती घेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसमध्ये ज्यांनी बंडखोरी केली आहे यामध्ये रोहिता रेवडी, संपत सिंह, उपेंद्र कौर अहलुवालिया, शारदा राठोड, ललित नागर, सतबीर रातेरा यांसारखे दिग्गज नेते सहभागी आहेत. तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेल्या माजी आमदार रोहीता रेवडी आणि विजय जैन यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली आहे. दोघांनीही काँग्रेसचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

मोठी बातमी : मोदी-शाहंकडून पोर्ट ब्लेअरचे नामकरण; ‘श्री विजया पुरम’ म्हणून ओळखले जाणार

माजी मंत्री जसविंदर सिंह संधू यांचा मोठा मुलगा जसतेज संधूने काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जगाधरी मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने आदर्श पाल यांनी काँग्रेसची साथ सोडत आम् आदमी पार्टीचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

माजी अर्थमंत्री अपक्ष मैदानात

हरियाणाचे माजी (Haryana News) अर्थमंत्री संपत सिंह यांनी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. हांसीमध्ये काँग्रेसच्या पाच बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नरेश यादव, प्रेम मलिक, कर्ण सिंह बामल, सुमन शर्मा आणि मनोज राठी यांनी अपक्ष म्हणून रिंगणात लढण्याचं ठरवलं आहे. या नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भाजपकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

बंडखोरांना नियंत्रित करण्यात भाजपला थोडं यश मिळालं आहे. भाजपने आपल्या जवळपास सर्व बंडखोर नेत्यांची मनधरणी केली आहे आणि त्यांना पुन्हा आपल्या मागे मजबुतीने उभे केले आहे. परंतु तरीही भाजपचे दहा बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. माजी शिक्षणमंत्री रामविलास शर्मा, शिक्षण मंत्री सीमा त्रिखा, माजी आमदार नरेश कौशिक, राव बहादूर सिंह, लोकेश नांगरू या नेत्यांनी पक्षावरील राग आता बाजूला ठेवला आहे. तसेच अपक्ष लढण्यास नकार दिला आहे. काही मोठ्या नेत्यांनी निवडणूक लढण्याचा विचार सोडून दिला असला तरीही भाजपसमोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण काही नेत्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारा विरुद्ध शड्डू ठोकला आहे.

हिसारमध्ये भाजपमध्ये बंडखोरी करून माजी मंत्री सावित्री जिंदाल तसेच गौतम सरदाना यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सिरसातील भाजप नेते गोविंद कांडा यांनी फतेहाबाद मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केला आहे. कांडा यांच्या समर्थकांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार तेजवीर सिंह यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

काश्मिरच्या इलेक्शमध्ये इंजिनिअर राशिदची एन्ट्री! लोकसभेची पुनरावत्ती होणार?

चरखी दादरीमध्ये मागील चाळीस वर्षांपासून भाजपसोबत असलेले नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष संजय छपारिया यांनी सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. गन्नोर मतदारसंघातून देवेंद्र कादीयान यांनी तर सोनीपत मतदारसंघातून राजीव जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यांसह आणखी काही नेत्यांनी भाजपला धक्का देत अपक्ष आणि अन्य पक्षांचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरण्याचे ठरवलं आहे. आता यातून किती जण आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us