Maharashtra Rain : राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार हो आहे. विश्रांती घेतलेला पाऊस लवकरच सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. एक ते दोन दिवसात मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस (Rain) होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राजधानी मुंबई (Mumbai) शहरात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली आहे. ढगाळ हवामान असले तरी पाऊस काही होत नाही. पाऊस नसल्याने खरीप हंगामही संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते.
आता मात्र लवकरच पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या काही भागात या आठवड्यात जोरदार पाऊस होईल. राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता त्यामुळे पावसाने दडी मारली होती. 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोर धरील. मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला होता. अन्य जिल्ह्यात मात्र फारसा पाऊस पडला नाही. आताही ऑगस्ट महिना अर्धा उलटून गेला तरी पावसाचा कुठेच पत्ता नाही. खरीप हंगामही संकटात सापडला आहे. त्यामुळे पाऊस कधी होईल याची प्रत्येकजण वाट पाहत होता. जवळपास वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर गुडन्यूज मिळाली आहे. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लवकरच पाऊसधारा कोसळतील असा अंदाज आहे.
नगरकरांनो सावध राहा! शहरात बिबट्याचा वावर
मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने 35 लाख हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहेत. अत्यल्प पावसामुळे खरिपाची उत्पादन क्षमता सरासरी 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. पुढील आठ दिवसात चांगला पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.