Download App

हेमंत सोरेन 31 तासांनंतर रांचीत, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदार भावूक; ईडीकडून अटकेची शक्यता

Hemant Soren : ईडीच्या नोटीसनंतर 31 तास गायब असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) त्यांच्या रांची (Ranchi) येथील शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी झामुमो, काँग्रेस आणि आरजेडीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर उपस्थित आमदार भावूक झाल्याचं दिसून आले. अनेकांनी त्यांना मिठी मारली तर काही पाया पडले. या बैठकीला हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) देखील उपस्थित होत्या.

हेमंत सोरेन यांच्यावर काय आरोप आहेत?
दरम्यान, हेमंत सोरेन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत ईडी कारवाई आहे. परंतु झारखंड मुक्ती मोर्चा आणि हेमंत सोरेन यांनी ह्या चौकशीला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे, तर भाजपने याला भ्रष्टाचाराविरुद्धचं पाऊल म्हटले आहे. सध्या हेमंत सोरेन यांच्यावर ईडी ज्या प्रकरणात कारवाई करत आहे ते प्रकरण जमीन आणि खाण घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणात, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) अंतर्गत सोरेन यांना 10 समन्स बजावण्यात आले होते.

तपास यंत्रणा रांचीत बेकायदेशीर खाणकाम आणि जमीन घोटाळा या दोन मोठ्या प्रकरणांचा तपास करत आहेत. जमीन घोटाळा प्रकरण लष्कराच्या ताब्यात असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. बनावट नाव आणि पत्त्याच्या आधारे झारखंडमध्ये लष्कराची जमीन खरेदी-विक्री करण्यात आली होती. याप्रकरणी रांची महापालिकेने एफआयआर दाखल केला होता. ईडीने याच एफआयआरच्या आधारे एनफोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट (ECIR) दाखल करून तपास सुरू केला होता. याशिवाय 2022 पासून राज्यातील बेकायदेशीर खाणकामातून झालेल्या 100 कोटी रुपयांच्या उत्पन्नाची ईडी चौकशी करत आहे.

झारखंडमधील वाढत्या राजकीय घडामोडी पाहता रांचीमध्ये तीन ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, ईडी कार्यालय आणि राजभवनच्या 100 मीटर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ: इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा, माजी परराष्ट्रमंत्र्यांनाही शिक्षा

हजर राहण्याची वेळ उद्या देण्यात आली
ईडीने गेल्या आठवड्यात सोरेन यांना नवीन समन्स जारी केले होते आणि 29 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान कधी उपलब्ध होऊ शकतात हे विचारले होते. सूत्रांनी सांगितले की, सोरेन यांनी ईडीला पत्र पाठवले होते, परंतु त्यांनी चौकशीसाठी तारीख आणि वेळ दिली नव्हती. 27 जानेवारी रोजी सीएम सोरेन दिल्लीहून रांचीला रवाना झाले. यानंतर 27 जानेवारीच्या दुपारपासून मुख्यमंत्री कुठं होते हे माहिती नाही.

ईडीला पुन्हा चौकशी करायची
ईडीने 20 जानेवारी रोजी या प्रकरणात प्रथमच सीएम सोरेन यांचे जवाब नोंदवला होता. सुमारे सात तासांच्या कालावधीत ईडी अधिकाऱ्यांनी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) जबाब नोंदवले. त्या दिवशी चौकशी संपली नसल्याचं समजतं, त्यामुळे नवीन समन्स बजावण्यात आलं आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, हे जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरण आहे. या जमिनीची मालकी माफियांकडे आहे. ईडीने या प्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली असून त्यात 2011 बॅचचे आयएएस अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे.

मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल; आंबेडकरांचा खळबळजनक दावा

follow us