Download App

लेट्सअप विश्लेषण : मविआ की महायुती?, राज्याच्या ‘रणसंग्रामात’ छोटे भिडू कुणाचा गेम करणार?

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदार पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Election) निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदार पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, या सगळ्यात काही छोटे पक्षही आहेत ज्यांच्याकडे स्वत:चा व्होट बेस आहे. यात प्रकाश आंबेडकर यांचा वंचित आणि मराठा आंदोलक मनोज दोन्ही युतींना तगडं आव्हान देऊन त्यांचा खेळ बिघडवू शकतात. जाणून घेऊया सविस्तर.

पवार कुठलेही संकेत देत नाहीत; राऊतांनी एका वाक्यात सर्व चर्चा ठरवल्या फोल!

मनोज जरांगे मोठा खेळ करण्याच्या तयारीत?

विधानसभांच्या घोषणेपूर्वी महायुती सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती. मात्र, त्यांचीही मागणी काही पूर्णत्वास आली नाही. त्यामुळे आता जरांगे मोठा दाव खेळण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात असून, जरागेंनी काही आमदारांना ठरवून पाडणार असल्याचा इशारा दिला आहे.

एवढेच नव्हे तर, येत्या 20 ऑक्टोबर रोजी मैदानात उतरवून लढायचं की पाडायचं याबाबत अंतरवली सराटीत आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता जरांगे काय घोषणा करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय विधानसभेत मोठा धक्का देण्यासाठी जरांगेंनी फक्त मराठ्यांनाच नाही तर, मुस्लिम, दलित आणि शेतकऱ्यांना एकत्र करून महायुती सरकार पाडू, असेही म्हटले आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरल्यापासून आणि आंदोलनांमुळे जरंगे यांची मराठा समाजात आणि विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे विधानसभांच्या रणधुमाळीत मराठवाड्यातील जागांवर महायुतीच्या उमेदवारांना दगाफटक्याला सामोरे जावे लागू शकते. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या पराभववाचा सामना करावा लागला होता.

मोठी बातमी : चर्चित IRS अधिकारी समीर वानखेडे सुरू करणार राजकीय इनिंग; पक्ष अन् मतदारसंघही ठरला

2019 ला साथ तर, 2024 ला फारकत

मराठवाड्यात मराठा समाजाची लोकसंख्या अंदाजे 32 टक्के इतकी आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा मतदारांचा मोठ्या मतदारांनी भाजपला साथ दिली होती. मात्र, 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात भाजपपासून दूर गेला, त्यामुळे एनडीएला मोठा तोटा सहन करावा लागला.

जरांगे-AMIMIM युतीची शक्यता?

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर छोट्या पक्षांमध्येही युतीच्या चर्चा जोरात सुरू झाल्या असून, एआयएमआयएमने जरंगे यांना युतीची ऑफर दिली आहे. AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी जरंगे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मंगळवारी (दि.15) सायंकाळी जलील यांनी जरंगे यांची भेट घेतली होती. यानंतर, इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्ही पक्षांसाठी हे छोटे पक्ष अडचणी निर्माण करू शकतात, अशी चर्चा तीव्र झाली आहे.

एका कार्डात मावणार नाहीत एवढी कामं; प्रगतीचा पाढा वाचत शिंदेंनी दिला ‘करेक्ट’ कार्यक्रमाचा इशारा

वंचितचा मविआला धोका

विधानसभा निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे जरांगे महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतात. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीवेळी शेवटच्या क्षणी युतीबाबत चर्चा न झाल्याने आंबेडकरांनी वेगळा मार्ग स्वीकारला होता. पण, असे करूनही लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

लोकसभेत आंबेडकरांच्या वंचितने 38 जागांवर निवडणूक लढवली होती परंतु केवळ 2 जागांवर त्यांचे उमेदवार त्यांचे डिपॉझिट वाचवण्यात यशस्वी ठरले होते. एवढेच नव्हे तर, खुद्द प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. मात्र, लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीचे मुद्दे आणि निकाल वेगळे असू शकतात, असे मत राजकीय जाणकारांचे आहे.

शरद पवारांचं टेन्शन वाढलं; निवडणूक चिन्हात ‘पिपाणी’ राहणारच!  

2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला होता फटका

यापूर्वी म्हणजे 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 4.57% मते मिळाली होती. त्यावेळी वंचितने 236 जागांवर निवडणूक लढवत अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (जुनी एकसंघ राष्ट्रवादी) उमेदवारांची अडचण झाली होती. मात्र, त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये उभी फुट पडल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत समीकरणे बरीच बदलली आहेत.

राज ठाकरेंकडूनही स्वबळाची घोषणा

लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे जरांगे आणि वंचितप्रमाणे मनसेला मानणाऱ्यांचा फटका मविआ आणि महायुतीला बसण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली, त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 जागा जिंकून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कडवी टक्कर दिली होती.

उद्धव ठाकरे, राहुल गांधींची सहमती घेतली का?, CM पदासाठी जयंत पाटलांचे नाव पुढे येताच मुंडेंचा टोला

मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार जिंकू शकला होता. याशिवाय महायुती व महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी एकत्र येत ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रासपच्या महादेव जानकरांनी विधानसभेच्या तोंडावर महायुतीला सोडचिठ्ठी देत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विधनसभा निवडणुकांमध्ये वंचित, मनोज जरांगे, परिवर्तन महाशक्ती आणि मनसेला मानणाऱ्या मतदारांचे मत विभागले जाऊन त्याचा फटका मविआ आणि महायुती या दोन्ही पक्षांना बसणार आहे.

follow us