Download App

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा ‘अभंग तुकाराम’; ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्रात प्रदर्शित

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा चित्रपट 7 नोव्हेंबरला घेऊन येत आहेत.

Abhang Tukaram Marathi Movie will Release Soon : मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात.

एकूणात रोजच्या जगण्यात आज 350 वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या अजरामर रचनांमधून वास्तव्य करताना आपल्याला दिसतात. जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा चित्रपट 7 नोव्हेंबरला घेऊन येत आहेत. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

संत तुकारामांची अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेतील धर्माच्या ठेकेदारांनी इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. तेव्हा संत तुकोबारायांनी हे आव्हान स्वीकारले आणि गाथा नदीत बुडवल्या. त्यांनतर या गाथा कशा तरल्या ? त्यातून काय संदेश दिला गेला ? आणि या सगळ्यात संपूर्ण समाजाने संत तुकारामांवरील भक्तीपोटी आणि प्रेमापोटी काय काय त्याग केला ? याचे थरारक आणि त्याचवेळेस भावस्पर्शी असे चित्रण ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात करण्यात आले आहे.

रश्मिका अन् विजय देवरकोंडा न्यूयॉर्कमध्ये करणार तिरंग्याला सलाम! 43 व्या ‘इंडिया डे परेड’साठी ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून निवड

या चित्रपटाचे मोशन टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यात पाण्याच्या तरंगांबरोबर वर जाणारे अभंगांचे कागद दिसतात. त्याबरोबर आपल्याला पाठमोरे संत तुकोबाराय दिसत आहेत. ज्यांनी आकाशाकडे हात पसरून साद घातलेली दिसत आहे. त्यांच्या समोरून उगवणारा सूर्य हा आशेचे किरण पसरवीत आहे. त्याचवेळी “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” ही तुकोबारायांची अमर रचना अत्यन्त सुमधुर स्वरात समूहाकडून ऐकू येत आहे. त्या तालावर ‘अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचे नाव भव्य स्वरूपात आकाशात आकाराला येऊन संत तुकारामांचे आणि त्यांच्या रचनांचे अभंगत्व अधोरेखित करताना दिसत आहे.

अत्यंत सुंदर अशा तांत्रिक सफाईने सादर केलेले चित्रपटाचे हे शीर्षक रसिकांच्या कुतूहलाचा आणि भावपूर्ण आतुरतेचा विषय बनले आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल 10 अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे अप्रतिम संगीत निर्माण करणारे प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

‘निशानची’ टीझरचा सुपरहिट धमाका! सेलिब्रिटींनी केलं भरभरून कौतुक

follow us