Jishnu Dev Varma On Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 11 एप्रिलच्या रात्री दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भोसले यांच्या निधनाने संगित, कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
आशा भोसले या देशातीलच नाही तर संगीत विश्वातील सिद्धहस्त आणि प्रतिभासंपन्न पार्श्वगायिका होत्या. आपल्या अवीट स्वरांनी, विविध संगीत प्रकार लीलया गाण्याच्या क्षमतेने आणि संगीतातील व्यापक योगदानामुळे त्यांनी संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यावर राज्य केले. आपल्या जवळपास आठ दशकांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी विविध भाषा व संगीत प्रकारांमध्ये असंख्य अजरामर गीते सादर करून भारताच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केले.
आशाजींची भावोत्कटता व कलेप्रती बांधिलकी भावी पिढ्यांमधील कलाकार आणि रसिकांना प्रेरणा देत राहील. ‘जो भी है बस यही एक पल है’ हे त्यांचे गाजलेले गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान झाले होते. आशाजींच्या निधनामुळे संगीत विश्वाचे, विशेषतः महाराष्ट्र राज्याचे, कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. आशाजींचा विवाह आर. डी. बर्मन यांच्याशी झाल्यामुळे त्यांचा आमच्या घराण्याशी देखील निकटचा संबंध होता.
लतादीदीनंतर आणखी एक तारा निखळला; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली आशा भोसलेंना श्रद्धांजली
या दुःखद प्रसंगी मी महाराष्ट्रातील जनतेच्या तसेच आपल्या स्वतःच्या वतीने दिवंगत आशाजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना तसेच संपूर्ण संगीत क्षेत्राला आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
