Tighi Movie : जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ हा संवेदनशील मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत असून आता या चित्रपटाने यशस्वी 50 दिवस पूर्ण केले आहेत. बॉलिवूड, हॉलिवूड व इतर प्रादेशिक चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘तिघी’ने आपली वेगळी ओळख टिकवून ठेवत प्रेक्षकांचा विश्वास जिंकला आहे.
आई, मुली आणि स्त्रीमनातील न बोललेल्या भावनांचा वेध घेणारी ‘तिघी’ ही कथा केवळ पडद्यावर मर्यादित न राहाता प्रेक्षकांच्या आयुष्याशी जोडली गेली आहे. प्रत्येकाच्या मनात कुठेतरी दडलेल्या भावना, नात्यांमधील सूक्ष्म गुंतागुंत आणि न सांगितलेल्या गोष्टींना या चित्रपटाने जिवंत स्पर्श दिला आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शोज वाढवण्याची मागणी होत असून ‘तिघी’ला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, फक्त मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांच्या भावविश्वातही या चित्रपटाने आपली छाप उमटवली आहे. ‘तिघी’ हा असा दुर्मीळ चित्रपट ठरला आहे, ज्याला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचाही तितकाच प्रतिसाद मिळत आहे.
सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले असून निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. यात भारती आचरेकर, नेहा पेंडसे-बायस आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिका प्रेक्षकांना भावत आहेत. एक वेगळा आणि भावनिक अनुभव देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करत आहे.
दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, ” ‘तिघी’ला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद खरंच मनापासून आनंद देणारा आहे. आपण सांगू पाहिलेली भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेय, हे प्रत्येक दिग्दर्शकासाठी मोठं समाधान असतं. 50 दिवस पूर्ण करताना प्रत्येक क्षण खास वाटतोय. अनेकांनी या चित्रपटाशी स्वतःला जोडून घेतलं, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकताना खूप छान वाटतं. ‘तिघी’ ही केवळ कथा नसून अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांचा आरसा आहे आणि तो इतक्या प्रेमाने स्वीकारला जातोय, यापेक्षा मोठं यश काहीच नाही.”
32 बवावट खाते अन् कोट्यवधींचे डाव, अशोक खरात प्रकरणात पतसंस्थेचा मॅनेजर अटकेत
‘तिघी’ने केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवले नाही, तर प्रेक्षकांच्या भावविश्वातही आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. नात्यांमधील नाजूक धाग्यांना स्पर्श करणारा हा चित्रपट पुढेही असाच प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहील, यात शंका नाही.
