अमेरिकेत पार पडलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन (Thackeray) फिल्म असोसिएशन मराठी फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. हॉलिवूडच्या भूमीत मराठी चित्रपटांचा गौरव करताना पाच मराठी चित्रपटांचे प्रीमिअर आणि पुरस्कारप्राप्त 11 शॉर्टफिल्म्सचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले.
या सोहळ्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे आणि नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप सहभागी झाले. कलाकारांच्या अनुभवांनी आणि सिनेसृष्टीतील प्रवासाच्या आठवणींनी कार्यक्रम रंगला.
दरम्यान, ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांनी प्रसाद ओकशी संवाद साधला. यावेळी ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेपासून ते त्यामागील राजकीय संदर्भांपर्यंत अनेक विषयांवर प्रसाद ओकने मनमोकळेपणाने भाष्य केले.
आनंद दिघे यांची भूमिका साकारताना आपल्याला कोणतीही भीती वाटली नसल्याचे प्रसाद ओकने स्पष्ट केले. कलाकार म्हणून एखादी आव्हानात्मक भूमिका मिळणे हीच मोठी संधी असल्याचे सांगत त्याने ‘धर्मवीर’ हा आपल्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले.
प्रसाद ओकच्या मते, ‘धर्मवीर’ हा त्याचा कारकिर्दीतील 96वा चित्रपट होता. जवळपास 95 चित्रपट केल्यानंतरही एखादी लक्षवेधी आणि सक्षम भूमिका आपल्या वाट्याला यावी, अशी प्रतीक्षा होती. आनंद दिघे यांची भूमिका मिळाल्यानंतर ती संधी पूर्ण ताकदीने साकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.
मात्र आनंद दिघे यांना प्रत्यक्ष भेटण्याची किंवा जवळून पाहण्याची संधी प्रसाद ओकला मिळाली नव्हती. त्यामुळे उपलब्ध छायाचित्रे, काही व्हिडीओ आणि त्यांच्या संदर्भातील आठवणी यांच्या आधारे व्यक्तिरेखा समजून घेण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते.
दिघे यांना जवळून पाहिलेल्या अनेक व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या आठवणी जाणून घेतल्या. प्रवीण तरडे यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणातील रेकॉर्डिंगमधूनही अनेक संदर्भ मिळाले. एकाच प्रकारच्या वारंवार सांगितल्या जाणाऱ्या आठवणींचा अभ्यास करून दिघे यांच्या व्यक्तिरेखेची मांडणी करण्यात आल्याचे प्रसाद ओकने सांगितले.
भूमिका अंतिम करण्यापूर्वी दिघे यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांकडून त्याबाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या. त्यांना व्यक्तिरेखा योग्य वाटल्यानंतरच ती पडद्यावर आणण्यात आल्याचेही त्याने स्पष्ट केले.
‘धर्मवीर’च्या प्रदर्शनाच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू होती. त्यामुळे ही भूमिका साकारल्याने राजकीय पातळीवर कधी अडचण निर्माण झाली का, असा प्रश्नही प्रसाद ओकला विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना त्याने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही आपल्या जवळचे असल्याचे सांगितले. आपण कोणती भूमिका का साकारत आहोत, याबाबत दोघांकडूनही कधी प्रश्न उपस्थित करण्यात आला नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
चित्रपट पाहिल्यानंतर संजय राऊत यांनी आपले कौतुक केल्याचेही प्रसाद ओकने सांगितले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनीही चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याबद्दल केलेल्या कौतुकाचा प्रसंग त्याने सांगितला.
उद्धव ठाकरे यांनी प्रसाद ओकची भेट होईपर्यंत माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता, असा दावा त्याने केला. गर्दीतून आपल्याला त्यांच्यापर्यंत नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी भूमिका साकारल्याबद्दल कौतुक केल्याची आठवण प्रसाद ओकने सांगितली.
‘धर्मवीर’मधील आनंद दिघेंची भूमिका साकारताना राजकीय दबाव किंवा अडचणींचा सामना करावा लागला नसल्याचे प्रसाद ओकने स्पष्ट केले. कलाकार म्हणून भूमिका आणि तिच्याशी प्रामाणिक राहणे, हा आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्याच्या वक्तव्यावरून अधोरेखित झाले.
