Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय (Pahalgam Terror Attack) नागरिकांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला. या घटनेवर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर पाकिस्तानातही खळबळ उडाली आहे. भारत आपल्यावर हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सतावत आहे. यामागे कारणही आहे भारत सरकारने बुधवारी पाकिस्तानविरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले. या निर्णयांमुळे पाकिस्तानी राज्यकर्ते काळजीत पडले आहेत.
पाकिस्तानला त्याच्या कृत्यांचा धडा शिकवण्याचा मोठा विचार भारत सरकारने केल्याचे आता स्पष्ट होत आहे. भारत सरकारने सर्वात आधी सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला आहे. याबरोबरच अटारी वाघा बॉर्डरही सील केली आहे. इतकेच नाही तर भारताने पाकिस्तानबरोबरच्या राजनयिक संबंधांतही कपात केली आहे. बुधवारी रात्री परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विवेक मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयांची माहिती दिली.
भारत पाकिस्तानचे पाणी तोडू शकतो का?; किती ताकद अन् अधिकार.. जाणून घ्या, पाणीवाटपाचा इतिहास
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा समितीची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर पाकिस्तानही कठोर प्रतिक्रिया देईल असे सांगण्यात आले. पाकिस्तानने नौदलालाही अलर्ट मोडवर ठेवले आहे. पाकिस्तानला अशी भीती वाटत आहे की भारत एखाद्या कारवाईत नौदलाचा वापर करू शकतो. यामुळेच पाकिस्तान सरकारने दोन दिवसांची फायरिंग वॉर्निंग जारी केली आहे.