Download App

Electric vehicle: आनंदाची बातमी, इलेक्ट्रीक कार स्वस्त होणार?

नवी दिल्ली : इलेक्ट्रीक वाहन (Electric vehicle) वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भविष्यात इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण बॅटरीमध्ये लागणाऱ्या लिथियमचा (lithium) मोठा साठा देशात मिळाला आहे.

देशातील 11 राज्यात खनिजांचा मोठा साठा मिळाला आहे. भारताला आतापर्यंत 100 टक्के लिथियम आयात करावे लागत होते. आता लिथियमसह सोन्याचाही साठा (lithium and gold)मिळाला आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने राज्य सरकार आणि कोळसा मंत्रालयाला ही माहिती दिली आहे.

देशातील 51 ब्लॉक मोठ्या प्रमाणावर खनिजांचा साठा (lithium and gold)सापडला आहे. त्यात जम्मू आणि काश्मीरात सापडलेल्या लिथियमचा समावेश आहे. या राज्यांमध्ये जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.

जगातील लिथियम साठ्याच्या बाबतीत चिली 9.3 दशलक्ष टनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 63 लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काश्मीरमध्ये 59 लाख टन साठा मिळाल्यानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अर्जेंटिना 27 दशलक्ष टन साठ्यासह चौथ्या, चीन 2 दशलक्ष टन साठ्यासह पाचव्या आणि अमेरिका 1 दशलक्ष टन साठ्यासह सहाव्या स्थानावर आहे.

फक्त लिथियमचा साठा मिळवून लिथियम आयन बॅटरी बनवणे सोपे होणार नाही. लिथियमचे उत्पादन आणि शुद्धीकरण हे खूप कठीण काम आहे. कारण चिलीमध्ये 9.3 दशलक्ष टन साठा असूनही केवळ 0.39 दशलक्ष टन उत्पादन होऊ शकते. ऑस्ट्रेलियात लिथियम 63 लक्ष टन साठा पण उत्पादन 0.6 दशलक्ष टन आहे. म्हणजेच मिळालेल्या साठ्यातून उत्पादन करणे भारतासाठी सोपे नाही. भारत जर लिथियमचा वापर करण्यात सक्षम झाला तर देशांतर्गत बाजारपेठेत लिथियम-आयन बॅटरीच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे.

भारताने आपल्या साठ्यातून लिथियम तयार करण्यात यश मिळवले तर त्याचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो. यामुळे इलेक्ट्रिक बॅटरी स्वस्त होऊ शकतात, ज्यामुळे इलेक्ट्रिक कार अधिक स्वस्त होतील. वास्तविक, इलेक्ट्रिक कारच्या किंमतीपैकी सुमारे 45 टक्के बॅटरीचा खर्च असतो. उदाहरणार्थ, Nexon EV मध्ये बसवलेल्या बॅटरी पॅकची किंमत 7 लाख रुपये आहे, तर त्याची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे.

2030 पर्यंत भारतातील 30% खाजगी कार, 70% व्यावसायिक वाहने आणि 80% दुचाकी इलेक्ट्रिक बनवण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. साहजिकच हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतात लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. पण केवळ लिथियमचा साठा मिळवून हे शक्य होणार नाही. यासाठी बॅटरी निर्मितीमध्ये लिथियमचा वापर करणे आवश्यक आहे. भारतात चीनकडून सर्वात जास्त बॅटऱ्या आयात होतात.

अमेरिकेनंतर भारत हा लिथियम आयन बॅटरीचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. भारतात सर्वाधिक बॅटरी चीन, जपान आणि व्हिएतनाममधून आयात केली जातात. आता या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताला एक तंत्रज्ञान विकसित करावे लागेल, जेणेकरून ते देशात लिथियम आयन बॅटरी तयार करू शकतील. 2030 चे लक्ष्य लक्षात घेता, भारताला दरवर्षी 10 दशलक्ष लिथियम आयन बॅटऱ्यांचे उत्पादन करावे लागणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज