Download App

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजे छत्रपतींचा बहिष्कार; ट्वीट करत सडकून टीका

Maharashtra Maratha Reservation: राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला असताना आज मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. बैठकीला सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी पक्षांमधील अनेक मंत्री उपस्थित होते. परंतु, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) मात्र बैठकीला अनुपस्थित होते. उपमुख्यमंत्री यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची ही रिकामीच ठेवली असल्याचे बघायला मिळाली आहे. अशातच संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आरक्षण प्रश्नी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी स्वतः यासंदर्भात ट्वीट करत सडकून टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते मात्र मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाले व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला.

Maratha Reservation : ‘…तर पाणीही बंद करणार’; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम!

पण सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात मात्र मार्ग सांगत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.

मराठा आरक्षण विषयक कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे आज प्रथमच अशा बैठकीस अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी या बैठकीस पोकळ बैठक असे संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर देखील मराठा आरक्षण पेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे महत्त्वाचे वाटत असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

Tags

follow us