Credit dispute between Satyajit Tambe and Amol Khatal : संगमनेर येथे नव्या पोलीस वसाहतीच्या निर्मितीस मंजुरी मिळाली आहे. ही पोलीस वसाहत पूर्ण झाल्यानंतर संगमनेर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा दीर्घकालीन प्रश्न सुटणार असून याचा थेट फायदा कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी होणार आहे. मात्र, या पोलीस वसाहतीच्या निर्मितीस मंजुरी मिळाल्यानंतर ही पोलीस वसाहत आमच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचे सांगत विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे व विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे दिसत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे व आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मंजुरी प्राप्त झाल्याचे आमदार तांबे समर्थक सांगत आहेत. तसेच आमदार तांबे यांनी महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पोलीस वसाहतीच्या बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी तसेच या वसाहतीचा आराखडा आधुनिक व नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात यावा व जास्तीत जास्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना निवासाची सुविधा मिळावी, याबाबत चर्चा केली होती.
दहा पक्ष बदलणारा मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतोय; जयंत पाटील यांचे सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर
मात्र, आमदार अमोल खताळ यांनी हा दावा खोडून काढला आहे. आमदार अमोल खताळ म्हणाले, संगमनेर मतदारसंघातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न गंभीर असून, या विषयावर आपण यापूर्वी विधानसभेत आवाज उठवल्यामुळेच वसाहतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. काम टप्प्यात आले की श्रेय घेण्याची धडपड काहींची सुरू होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्याकडे आपण पाठपुरावा केला असल्याचे खताळ यांनी सांगितले. कोण श्रेय घेतो यापेक्षा महायुती सरकारच्या काळात निर्णय होत असल्याचे समाधान आमदार खताळ यांनी व्यक्त केले. त्यामुळे संगमनेर येथे पोलीस वसाहतीच्या निर्मितीस मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही आमदारांची श्रेय घेण्यासाठी धडपड सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
