Dhananjay Munde On Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्याचा कट रचला होता असा दावा जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला आहे. मनोज जरांगे यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. धनंजय मुंडे पृथ्वीतलावरच नसावा यासाठी जरांगेंची धडपड सुरु आहे अशी टीका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंवर केली.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, जात पाहून मी राजकारण केलं नाही. मराठा आरक्षणाचा ठराव बीड जिल्हा परिषदेत मी सर्वप्रथम घेतला बीडनंतर इतर जिल्हापरिषद नगरपालिकांत मराठा आरक्षण ठराव झाले. परळीत जरांगेंच्या आंदोलनाला आम्ही सर्वतोपरी मदत केली. मी गोपीनाथ मुंडेंच्या संस्कारातून घडलोय. मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते असताना मदत केली होती. अण्णासाहेब जावळे, मेटे, संभाजी महाराजांच्या खांद्यालाखांदा लावून मी लढाईत लढलो. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सभागृह बंद पाडलं. पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात 80 हजार कुणबी प्रमाणपत्र दिले असं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडेंनी हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप
तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत धनंजय मुंडे म्हणाले की, जरांगे आणि माझं कधीही वैर नव्हतं. 17 ऑक्टोबरची सभा वगळता मी कधीही जरांगेवर टीका केली नाही. धनंजय मुंडे पृथ्वीतलावरच नसावा यासाठी जरांगेंची धडपड सुरु आहे. आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. तसेच मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येत असतील तर या प्रकरणात राज्य सरकारने नाही तर सीबीआयने चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे अशी मागणी केली.
माझी प्रतिमा गुन्हेगारासारखी करण्याचा प्रयत्न : धनंजय मुंडे
आज राज्यात माझी प्रतिमा गुन्हेगारासारखी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मात्र कर्मा रिपीट्स होतो. तुम्ही जेवढी लोकांची बदनामी करणार तेवढी बदनामी तुमची देखील होणार जरांगे तुम्हाला फार महागात पडणार असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
हाकेंना मारले, तुम्ही वाघमारेंना मारले, अशी बरीच उदाहरणे आहेत. 17 तारखेच्या सभेत मी जरांगेंना दोनच प्रश्न विचारले. त्याचे उत्तर अजून मिळाले नाही. पहिला प्रश्न विचारला होता, मराठा समाजाला ओबीसीत जाऊन फायदा आहे की ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे. याबाबत साडेबारा कोटी जनतेसमोर त्यांनी यावं, आम्ही येतो. कशात फायदा आहे यावर सोक्षमोक्ष करूयात. उगाच एखाद्यावर आरोप करायचे? मुख्यमंत्र्यांच्या आईबहिणीवर बोलायचे. पंकजा ताईंबद्दल काहीही बोलायचे. आम्हाला पण वाटते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता. माझा एका फोन आहे, जो 24 तास सुरू असतो, असेही मुंडे म्हणाले.
