मुंबई : दिवंगत खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर भ्याड हल्ला झाला होता. सातव यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली. आता याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राज्यातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर गुरुवारी जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र सुदैवाने या हल्ल्यातून त्या सुखरुप बचावल्या आहेत. यावर राजकीय स्तरातून निषेध देखील करण्यात आला.
या हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केले आहे. यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या घटनेचा निषेध करत राज्याच्या गृहमंत्र्यांना कारवाईची मागणी केली आहे.
अंधारे म्हणाल्या, प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्याचा मी पक्षाच्या वतीने अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पण यानिमित्ताने एकूणच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांना जर अशा पद्धतीने घाबरवलं धमकावले जात असेल, त्यांच्यावर असे हल्ले होत असतील तर गाव गाड्या आणि चतुर्थ सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, याप्रकरणाची गंभीर दाखल घेण्यात यावी, तसेच योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.