Heavy Rain Maharashtra Updates : राज्यातील बहुतांश भागात आज(26 जुलै) पावसाच्या मुसळधार सरी कोसळताय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अनेक भागात पहाटे पासुनच पावसाला सुरूवात झाली आहे. (Rain) यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा परिसरात आज जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यासह नागपुरातहि पावसाने आज सकाळपासून हजेरी लावली आहे. तर, दुसरीकडे रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोबतच महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड-पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीच्या कारणास्तव हा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून महाड व पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
मोठी बातमी! राधानगरी लक्ष्मी तलाव भरला; ४ हजार क्युसेक विसर्ग सुरू, काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पालघरमध्ये पावसाचा जोर कायम असून पहाटेपासूनच पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. आज पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट घोषित असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एकूणच पाहायला गेलं तर हा पाऊस गेले काही दिवस सातत्याने सुरू असताना शेतीच्या कामाला सुद्धा वेग आला असून 80 टक्के भात रोपण्या आहेत, त्या पूर्ण करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील नदी नाल्यांना सुद्धा पावसामुळे पूर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांनाही सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आला आहे.
विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल दिवसभर झालेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क जवळच्या तालुक्यांशी किंवा जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला असून आज पुन्हा दमदार पाऊस झाल्यास स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातूनही सतत पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळेही वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे.