Jain sage Nilesh Chandra’s reply to Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. महाराणी ताराबाई यांच्याबाबत जैन मुनी नयन पदमसागर यांच्या विधानावरून आधीच वाद निर्माण झाला असताना, आता आणखी एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि नितेश राणे यांची तुलना केल्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी नितेश राणेंची उंची छत्रपती शिवाजी महाराजांसारखीच आहे, असे वक्तव्य केले.
याशिवाय, नितेश राणे भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांची आक्रमक भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी असल्याचं देखील ते म्हणाले. या वक्तव्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. जैन मुनींचं डोकं सडलं आहे का? त्यांचे रक्त बदलले आहे का? त्यांना फटाके खायचे आहेत का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
तसेच आमच्या देवतांबाबत असे बोलाल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला. जैन समाजाला आवाहन करत, हे मुनी चुकीचे बोलत असतील तर तुम्हीच त्यांना आवरा, असं देखील जरांगे यांनी म्हटलं. दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी स्पष्टीकरण दिलं. मी सर्व धर्मांसाठी काम करतो, मी सनातनी आहे. कदाचित मनोज जरांगे यांना काही गैरसमज झाला असावा, असं त्यांनी सांगितलं.
तसेच फटके मारायचे असतील तर मुंब्रा हिरवा करणाऱ्यांना मारा, असं प्रत्युत्तर देत त्यांनी आपली भूमिका मांडली. एकूणच, महापुरुषांच्या संदर्भातील वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून, या प्रकरणाचा पुढील राजकीय आणि सामाजिक परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
