Jalna Collector Shrikrishna Panchal : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ (Shrikrishna Panchal) यांनी कारवाई करत अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात (Jalna Rainfall Grant Scam Case) पुन्हा 11 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी 10 तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात 21 जणांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून आज झालेल्या कारवाईत 7 तलाठ्यांसह 4 कार्यालयीन क्लार्क कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
डिजी कुरेवाड, सचिन बागुल,राजू शेख, एसएस कुलकर्णी,ज्योती खर्जुले,एसएम जारवाल,डिजी चांदमारे,आरबी माळी,आशिष पैठणकर,सुशील जाधव,व्हीडी ससाणे अशी नव्याने निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांनी 2022 ते 2024 दरम्यान शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीपोटी आलेलं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर न जमा करता बोगस शेतकऱ्यांच्या नावावर जमा करून हडपल्याच निष्पन्न झाल्यानं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ही कारवाई केली आहे.
तर दुसरीकडे या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात एकूण 87 कर्मचारी रडारवर असून तहसिलदार आणि नायब तहसीलदार यांच्याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे कारवाईसाठी पाठवण्यात येणार आहे. तसेच 35 तलाठ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती देखील जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
2022, 23 आणि 24 वर्षांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते त्यांची नुकसान भरपाईसाठी शासनाने 110 कोटी 94 लाख 46 हजार 900 रुपये मंजूर केले होते मात्र यापैकी 110 कोटी 60 लाख 2 हजार 223 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली मात्र अंबड आणि घनसावंगी तालूक्यात तहसीलदारांच्या लॉगइन पासवर्डचा गैरवापर करुन कर्मचाऱ्यांनी काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जास्तीची रक्कम वर्ग केली तर काहींना दुबार अनुदान दिले. या दोन तालुक्यात 34 कोटी 97 लाख रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणात 87 कर्मचाऱ्यांकडून खुलासे मागवण्यात आले आहे.
मनसेसोबत युती, स्थानिक पातळीवर आढावा द्या, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश