राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. (Agriculture) आतापर्यंतची राज्यातील ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. अगोदर ही कर्जमाफी 30 जूनपर्यंत होणार होती. परंतु काही तांत्रिक कारणं तसेच अटी बदलल्यामुळे या कर्जमाफीला उशीर झाला. काही दिवसांपूर्वी सरकारने या कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळाली आहे.
समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार कर्जमाफीच्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम उद्या म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी जमा केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली E KYC पूर्ण केलेली आहे. त्यांच्याच बँक खात्यात ही रक्कम पाठवली जाईल. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत एकूण 16 लाख 96 हजार पात्र शेतकरी होते. या पात्र शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.
राज्य सरकारने ही कर्जमाफी करण्यासाठी एकूण 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. यापैकी साधारण 7 हजार कोटी रुपये 4 ऑगस्ट रोजी वितरित केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही रक्कम वितरित केली जाईल. दरम्यान, आम्ही शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी देऊ असे सरकारने आश्वासन दिले होते. परंतु प्रशासकीय कामात वेळ गेल्याने ही कर्जमाफी लांबली.
पुढं सरकारने ही कर्जमाफी करताना काही अटी समोर ठेवल्या होत्या. यातील काही अटी या जाचक आहेत, असा दावा करत विरोधकांनी कर्जमाफीवर आक्षेप घेतले होते. काही ठिकाणी या अटींविरोधात आंदोलनही करण्यात आले होते. म्हणूनच सरकारने अटींवर फेरविचार करत काही नियमांत बदल केला. त्यामुळे आता ही कर्जमाफी अधिक व्यापक झाली आहे. त्यानंतर सरकारने पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली होती. आता शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमेचे प्रत्यक्ष वितरण सुरू करण्यात आले आहे.
