Download App

मनोज जरागेंची प्रकृती बिघडली, भाषण करतांना भोवळ, साताऱ्यात नेमकं काय घडलं?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. साताऱ्यात शांतता रॅलीला संबोधित करत असताना त्यांना भोवळ आली.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची तब्येत खालावली आहे. साताऱ्यात शांतता रॅलीला (Peace Rally) संबोधित करत असताना त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मातोश्रीबाहेर मुस्लिम समाज आक्रमक, ठाकरेंविरोधात घोषणाबाजी, नेमकं घडलं काय? 

मनोज जरांगे हे गेल्या अनेक महिन्यांपासून मेळावे, सभा घेत आहेत. त्यांच्या सभा आणि रॅलीला मराठा समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. उपोषणानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर, सांगली, कोल्हापूर येथे त्यांच्या शांतता रॅलीच्या सभा झाल्या आहेत. या सभांना लाखो लोक उपस्थित होते. आज त्यांची साताऱ्यात शांतता रॅली होती.

‘केज’साठी पवारांनी हेरला मुंडेंचाच शिलेदार; प्रवेशाची औपचारिकता बाकी? 

या रॅलीनंतर जरांगे मराठा बांधवांना संबोधित करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी कंबरेला पट्टा बांधून सुमारे तासभर मराठा समाजाशी संवाद साधला. भाषण करत असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि ते स्टेजवर बसले. त्यांचे हात थरथरत होते. त्यामुळे त्यांना तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशक्तपणामुळे त्यांना चक्कर येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार त्यांना अशक्तपणा येत होता. भाषणादरम्यानही मनोज जरांगे यांनी प्रकृती ठीक नसल्याचा उल्लेख केला होता. सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जरांगे पाटील यांची उद्या पुण्यात शांतता रॅली होणार आहे. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानं ते या रॅलीला उपस्थित राहणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनोज जरांगे हे मराठा बांधवांना फोनवरून संबोधित करणार असल्याचेही बोलले जात आहे.

follow us