Download App

‘स्वराज्यरक्षक’ दुसरं कोणाला म्हणता येणार नाही, अजित पवारांनी ठणकावून सांगितलं

पुणे : सध्या धर्मवीर नाव कोणीही कोणाला देतंय, तर काही जण चित्रपट काढत आहेत, धर्मवीर नाव कोणालाही देत आहेत. मात्र, स्वराज्यरक्षक दुसरं कोणाला म्हणता येणार नाही कारण, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांसारखा दुसरा कोणी होऊच शकत नसल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असंही ते विधी मंडळात म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर भारतीय जनता पक्षासह इतर संघटनांकडून आंदोलने करण्यात आले.

त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं वावगं ठरणार नसल्याचं पत्रकार परिषदेत म्हंटलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माफी किंवा दिलगिरी व्यक्त केली नसून याउलट छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी स्वराज्यरक्षकच असा केला आहे. तसेच प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

तसेच सत्तेत बसलेल्यांनी आपलं काम करावं, बाकीच्यांनी मला शिवकण्याचं काम नाही त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी, असाही टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे. दरम्यान, शरद पवार यांना जाणता राजा म्हणतात, ते मी म्हणायला सांगितलेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असून बाकीच्यांनी मला शिवकण्याचं काम नाही. त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी. मी माझी भूमिका घेत आहे. भाजपकडून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं सुरु आहे.

याबाबतचं नियोजन दोन दिवसांपूर्वी सुरु असतं. या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड मात्र, बाहेरच असतो. त्यांच्या कल्पनेतून हे सगळं पुढं आलं त्यानंतर आदेश आला. आदेशात आंदोलने करा, पुतळे जाळा, असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Tags

follow us