Download App

जयंत पाटील लागले विधानसभेच्या तयारीला, आजपासून ‘वारे परिवर्तनाचे’

  • Written By: Last Updated:

नंदुरबार : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह भेटले आहे. आता कोणत्याही क्षणी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो. कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागून निवडणूका लागू शकतात किंवा 2024 ला लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आताच तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आजपासून उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे.

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आजपासून “राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…” या दौऱ्याला सुरुवात केली आहे.

राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे ध्येय नजरेसमोर त्यांनी ठेवले आहे.

काँग्रेसचा राजघाटवर सत्याग्रह, प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल

स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षसंघटना वाढीवर आणि सभासद नोंदणीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले. गावागावात पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते निर्माण करण्याची गरज आहे.पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावावा. एकसंघ राहून पक्षाचे काम केल्यास त्याचा उत्तम निकाल आपल्याला मिळेल असा दृढ विश्वासही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

सामान्य जनतेला आपल्या पक्षाकडून अनेक अपेक्षा आहेत. राज्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी या विश्वासाला पात्र ठरेल असे लोकोपयोगी काम करूया असे आवाहनही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. दौऱ्याची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून झाली.

Tags

follow us