Download App

मतदार याद्यांत घोळ, पाच महिन्यांत लाखो मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला.

Rahul Gandhi Press Conference : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला. या निवडणुकीत गडबड झाली. मतदार याद्यांत गडबड झाली. मागील पाच वर्षांच्या काळात राज्यातील मतदार याद्यांत सात लाख मतदार जोडण्यात आले असा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. निवडणुकीच्या आधी राज्यात इतके लोक कुठून आले असा सवाल करत CEC निवड करण्याची प्रक्रिया सुद्धा बदलण्यात आली असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

39 लाख मतदार अचानक कसे वाढले

राहुल गांधी म्हणाले, 2019 ते 2024 या काळात 34 लाख मतदारांची जोडणी झाली. नंतर 2024 मधील लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत 39 लाख मतदार वाढले. महाराष्ट्रात मतदारांची संख्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. आम्ही फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांची मागणी करत आहोत. 2019 मधील विधानसभा निवडणूक आणि 2024 मधील निवडणुकीत 34 लाख मतदार होते. तसेच 2019 आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीत 39 लाख मतदार होते. म्हणजेच मतदार वाढले आहेत. हे वाढलेले मतदार कुठून आले, असा सवाल राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला विचारला.

यानंतर राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील मतदार याद्यांतील घोळ गंभीर अनियमिततांचे संकेत देत आहे. मतदारसंघांतील भाजपाच्या विजयातील अंतर आणि मतदार यादीत जोडण्यात आलेल्या मतदार संख्येच्या बरोबरीने आहे असे राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय निर्माण झाला आहे.

टायगर अभी जिंदा है! “आमची वज्रमूठ” पक्षांतराच्या चर्चांवर ठाकरेंच्या खासदारांची एकी; तिघांची दांडी

निवडणूक आयोग सरकारचे गुलाम : संजय राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, जर देशातील निवडणूक आयोग जिवंत असेल तर त्यांनी राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. निवडणूक आयोग उत्तर देणार नाही कारण आयोग सरकारचा गुलाम झाला आहे. अतिरिक्त 39 लाख मतदार कुठून आले. आता ते बिहारमध्ये जातील, दिल्लीतही काही दिसले. आता ते पुढे उत्तर प्रदेशातही जातील असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. लेखी स्वरुपात उत्तर देणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदार याद्यांच्या बाबतीत देशभरात समान प्रक्रिया राबवण्यात येत असते असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

follow us