Download App

Shshikant Warise : शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरण आहे तरी काय?

रत्नागिरी ( Ratnagiri )  येथील पत्रकार शशिकांत वारीसे ( Shashikant Warise )  यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut )  यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण हे या बातमीत आपण जाणून घेऊयात.

शशिकांत वारीसे हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात महानगरी टाइम्स या वृत्तपत्राचे पत्रकार होते. त्यांचा सोमवार दि.  6 फेब्रुवारी रोजी सकाळी अपघात झाला. राजापूर या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर थार गाडीने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यानंतर त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी मंगळावर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व सहयोगी पत्रकारांनी संशय व्यक्त केला आहे.

या अपघातानंतर वारीसे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली असून जिल्हा न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शशिकांत वारीसे हे कोकणामध्ये रिफायनरीच्या विरोधात होते. त्यांनी कोकणामध्ये रिफायनरी सारखा प्रकल्प नको, अशी भूमिका घेतलेली होती. तसेच या भूमिकेमुळे आपल्या जीवाला बरे वाईट होण्याचा धोका देखील असू शकतो, हे त्यांना माहीत होते,  असे वारीसे यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्पावरून संघर्ष सुरू असून यामध्ये काही नागरिक या रिफायनरीचे समर्थन करत आहेत तर काहीजण विरोधात आहेत.

 

शशिकांत वारीसे यांच्या पाठीमागे त्यांचा 20 वर्षाचा मुलगा व 80 वर्षांची आई आहे. त्यांचा मुलगा सध्या रत्नागिरी येथे शिक्षण घेत आहे. वारीसे यांच्या हत्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून या घटनेमागील सूत्रधाराला कठोर शासन करणार, असे सांगितले आहे.

Tags

follow us