Municipal Corporations Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून येत्या काही दिवसांमध्ये या निवडणुकींसाठी कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता या निवडणुकीसाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.
“अ, ब व क” वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिले आहे. यामध्ये पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी- चिंचवड, कल्याण, छत्रपती सभाजीनगर सारख्या महानगरपालिकेंचा समावेश आहे. पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता या प्रक्रियेला वेग आला आहे.
राज्य सरकारच्या या आदेशानंतर ज्या महानगर पालिकेमध्ये निवडणुका नियोजित आहे त्या महानगर पालिकेमध्ये आता प्रशासकीय पातळीवर निवडणुकींची प्रक्रिया सुरु होणार आहे. “अ, ब व क” वर्ग महानगरपालिकांच्या बाबतीत प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याच्या अनुषंगाने सदस्य संख्या निश्चित करुन प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करणे ही जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांची असेल अशी माहिती देखील राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियाही सज्ज; WTC Final साठी ‘या’ 11 खेळाडूंना संधी
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग रचना जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 5 मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरिता प्रभाग रचना शासनाने, राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची आहे. तसेच या नियमाअंतर्गत प्रत्येक प्रभागातून शक्यतो चार, किमान तीन आणि कमाल पाच सदस्य निवडले जातील अशी तरतूद 2024 च्या अधिनियमानुसार करण्यात आली असल्याची माहिती देखील राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. यामुळे आता पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छ. संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.