ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हायरल इन्फेक्शन, तीव्र अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा त्रास होत होता. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना विशेष वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली रुग्णवाहिकेतून मुंबईत हलवण्यात आले.
अण्णांना 3 ऑगस्टपासून व्हायरल इन्फेक्शनचा त्रास आहे. त्यातून वारंवार डिहायड्रेशन झाले असून, दीर्घकाळाच्या संसर्गामुळे युरिन इन्फेक्शनचीही समस्या निर्माण झाली आहे. तसेच व्हायरल इन्फेक्शन आणि लूज मोशनमुळे त्यांच्या किडनीवरही परिणाम झाला आहे. वय 91 वर्षे असल्याने काही प्रमाणात विस्मरणाचा त्रास जाणवू शकतो, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. गौतम भन्साळी यांनी दिली.
युवा शक्ती ही एक राष्ट्र शक्ती, कॉक्रोज पार्टीबद्दल काय म्हणाले आण्णा हजारे?
दरम्यान, अण्णा हजारे यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढील तीन-चार दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो, असेही डॉ. भन्साळी यांनी सांगितले. त्यामुळे अण्णांच्या प्रकृतीबाबत निर्माण झालेली चिंता काहीशी कमी झाली आहे.
अण्णा हजारे यांच्यावर यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धीजवळील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, अंजली दमानिया यांनीही अण्णांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे चौकशी केली असून ते स्थिर असल्याचे डॉ. भन्साळी यांनी सांगितल्याची माहिती दिली. अण्णांनी आयुष्यभर समाजासाठी संघर्ष केला असून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली.
