Vikram Shinde : मराठी साहित्यविश्वात भरीव योगदान देणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी प्रसिद्ध कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली. मराठी साहित्य विश्वात बहुमूल्य योगदान देणाऱ्या लेखक, कवींना साहित्यसेवेच्या अनेक चांगल्या जबाबदाऱ्या मिळायला हव्यात, साहित्य क्षेत्रात युवा लेखकांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढायला हवे, असेही यावेळी ते म्हणाले.
अ.भा.म. साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, महाराष्ट्र प्रदेश संघटक अमोल कुंभार, परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश रेडेकर, प. महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. सुमेध गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी विक्रम मालन आप्पासो शिंदे यांचे यावेळी अभिनंदन केले. कामगारांच्या कवितेतून विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडण्याचे महत्वाचे काम केले आहे. श्वास ओला, अस्वस्थ, ज्ञानज्योत, अक्षरदीप या त्यांच्या प्रकाशित साहित्यकृती आहेत. साहित्य संमेलन आयोजनांच्या माध्यमातून त्यांनी कष्टकऱ्यांचे दर्जेदार लिखाण सारस्वतांच्या साहित्यिक पटलावर आणण्याचे भरीव कार्य केले आहे.
अनेक युवा तरूणांना साहित्य क्षेत्रात यशस्वी कवी, लेखक, प्रकाशक म्हणून घडवण्यात त्यांचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर ४० पेक्षा जास्त प्रकाशन आणि साहित्य संस्था नव्याने सुरू झाल्या आहेत. यातूनच अनेक युवक साहित्य विश्वात रचनात्मक काम करत आहेत. कवी, लेखक, संपादक, प्रकाशक ते साहित्य चळवळ नव्याने चालू ठेवणारा एक सर्वसमावेशक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
