Viral Video : मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर, पण इथली महागाई सामान्यांचं कंबरडं मोडते, असं आपण नेहमी ऐकतो. मात्र, सध्या एका रिक्षावाल्याने एका सुशिक्षित तरुणाला असा काही आरसा दाखवलाय की, ‘करिअर’ आणि ‘यशाच्या’ व्याख्याच बदलून गेल्या आहेत. सोशल मीडियावर या दोघांमधील संवादाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत नेमकं काय संभाषण?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि रिक्षावाला यांच्यात मुंबईतील महागाईवर गप्पा सुरू होत्या. त्यावेळी गप्पांच्या ओघात प्रवासी तरूणाने “मुंबईत राहणं किती महाग झालंय ना?” असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर रिक्षावाल्याने जे उत्तर दिलं, त्याने तरुणाची बोलतीच बंद झाली. प्रवाशाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रिक्षाचालकाने उत्तर दिलं की, “मुंबई महाग आहे हे खरंय, पण ही मुंबई कष्ट करणाऱ्याला कधीच उपाशी झोपू देत नाही. इथे पैसा खूप आहे, फक्त तो कमावण्याची जिद्द हवी,” असं तो रिक्षावाला आत्मविश्वासाने म्हणाला.
दिवसाच्या कमाईतून शिल्लक राहतात 2500 रुपये
पुढे प्रवासादरम्यान दोघांमध्ये गप्पाांचा फड रंगत गेला. त्यावेळी रिक्षाचालकाने आपल्या कमाईचा आकडा सांगितला. तो म्हणाला की, सगळा खर्च वजा करून माझ्याकडे दिवसाला सरासरी 2500 शिल्लक राहतात. हे ऐकताच समोरच्या तरुणाचा विश्वासच बसेना. त्याने पटकन हिशोब मांडला दिवसाचे 2500 म्हणजे महिन्याला तब्बल 75,000 हजार रुपये.
ही आकडेवारी बघून ” बी.टेक असलेल्या तरूणाने मी इंजिनिअर होऊनही इतकं कमवत नव्हतो…” “जेव्हा मी शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागलो, तेव्हा माझा पगारही इतका नव्हता अशी प्रांजळ कबुली प्रवाशाने दिली. “दिवसभर ऑफिसच्या चार भिंतीत आणि खुर्चीत अडकून पडण्यापेक्षा मुंबईत रिक्षा चालवणं कधीही चांगलं. इथे रोज नवीन माणसं भेटतात आणि कमाईही ‘व्हाईट कॉलर’ जॉबपेक्षा जास्त आहे. असा गमतीने एक मोलाचा सल्लाही दिला.
चर्चेला उधाण; डिग्री मोठी की कष्ट?
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर डिग्री मोठी की, कष्ट अशा चर्चेला अधाण आलं आहे. अनेक नेटिझन्सने लाखो रुपये खर्च करून इंजिनिअरिंग करण्यापेक्षा ‘हस्तकला’ किंवा ‘कौशल्य’ जास्त पैसे मिळवून देतात असे म्हटले आहे तर, एसी केबिनमध्ये तासनतास बसून मिळणारा ताण आणि रिक्षा चालवून मिळणारा आनंद याची तुलना आता लोक करू लागले आहेत. एकुणचं काय तर, मुंबईत आजही कष्ट करणाऱ्यासाठी संधींची कमतरता नाही, हे या रिक्षावाल्याने सिद्ध केलंय.
