Download App

Ahmednagar Agricultural Festival : पौष्टिक तृणधान्याच्या उत्पादनात अहमदनगर जिल्हा अग्रेसर राहावा – पालकमंत्री विखे

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन घेऊन आपला जिल्हा राज्यात तृणधान्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.

न्यू आर्टस, कॉमर्स ॲड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कृषिविभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशुप्रदर्शन 2023 चे उदघाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. सुजय विखे, (Dr. Sujay Vikhe) आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे कृषी उपसंचालक (आत्मा) राजाराम गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

https://www.youtube.com/watch?v=gXMghA2XkpQ

यावेळी बोलतांना पालकमंत्री विखे म्हणाले, बदलत्या आहारामुळे शरीरास आवश्यक पोषक तत्त्वांची उणीव भरुन काढून होणाऱ्या आजारांवर मात करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पांरपरिक आहाराला चालना देवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी केंद्र शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादनासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत असून शेतकऱ्यांनी या पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढीवर अधिक भर देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आदित्य ठाकरेंनी घेतली तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट 

बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर शासनाने भर दिला असून बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला एक व्यासपीठ मिळावे यादृष्टीकोनातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर महोत्सवात महिलाबचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी 300 स्टॉल उभारण्यात आले आहेत.

महिलाबचतगटांनी उत्पादित केलेला माल विक्री करता यावा यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 2 कोटी रुपये खर्चून बचतगटातील महिलांना विक्रीस्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले असुन येणाऱ्या काळातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही पालकमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी जिल्हास्तरावर महिलांच्या प्रशिक्षणासाठी भवन उभारण्यात येणार आहे. या भवनातून महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रानुसार दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील महिलांच्या बचतगटाचा एक ब्रँड तयार करुन तो संपुर्ण देशभर नावारुपास आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, कृषी, पशु व बचतगट असे सर्वसमावेशक 570 स्टॉल असलेल्या भव्य प्रदर्शनाचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला जिल्हावासियांनी भेट देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रदर्शनात तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी महिला बचतगटांच्या ई-कॅटलॉग, यशस्वी महिलांच्या यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचे विमोचन, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत, स्मार्ट प्रकल्प योजनेंतर्गत, भारतीय स्टेट बँकेमार्फत स्वयंसहाय्यता गटांना, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्जाच्या धनादेशाचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी अहमदनगर महोत्सव 2023 च्या लोगोचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बेडेकर यांनी केले तर आभार पद्मश्री पोपटराव पवार यांनी मानले.

Tags

follow us