Download App

राज्यसेवा परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासूनच लागू होणार; आयोगाकडून मोठी घोषणा

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यसेवा परीक्षेसाठी आयोगाने लागू केलेला लेखी पॅटर्न हा 2025 नंतर लागू व्हावा या प्रमुख मागणीसाठी ‘एमपीएससी’च्‍या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्‍यांनी धरणे आंदोलन पुकारले होते. राज्य सरकारने मध्यंतरी तोंडी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती उमेदवारांना केली होती. मात्र, याबाबत लेखी आश्वासन दिल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला होता. मात्र, आता विद्यार्थ्‍यांच्या या आंदोलनाला यश मिळालं आहे.

एमपीएससीचा अभ्यासक्रम 2023 पासून अचानक बदलण्यात आला होता. युपीएससी परीक्षेसारखा हा अभ्यासक्रम केला गेला. विद्यार्थी अनेक वर्षांपासून जुन्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करत आहेत. परंतु अभ्यासक्रम बदल्यामुळे त्यांची गेल्या काही वर्षांपासूनची मेहनत वाया जात होती. तसेच विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळाला होता. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. एमपीएससीचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा आणि आयोगाने या निर्णयाची अंबलबजावणी करावी या मागणीसाठी विद्यार्थी पुण्यात 20 फेब्रुवारीपासून रस्त्यावर होते.

गेल्या दोन महिन्यातील हे तिसरे आंदोलन होते. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले होते. सरकारने आश्वासन देऊनही आदेश न काढल्याबद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 21 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा आंदोलनस्थळी जात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. आंदोलन स्थळावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होते. शरद पवार यांच्या आवाहनानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, आंदोलनावर ठाम राहिले. अधिकृत घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

दरम्यान, आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम यंदापासून नाही तर 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे’ असे एमपीएससीने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us