Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एसआयआरच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला घेरलं आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आयोग मतं चोरी करत असल्याचे म्हटलं आहे. इतकंच नाहीतर राहुल गांधींनी असाही दावा केला की त्यांच्याकडं याबद्दल ठोस पुरावे आहेत.
देशाविरुद्ध काम करत आहे
संसद भवनात माध्यमांशी बोलताना खासदार राहुल गांधी म्हणाले, आता संपूर्ण देशाला कळलं, की निवडणूक आयोग मतं चोरत आहे आणि ते हे भाजपसाठी करत आहे. मी हे अत्यंत गांभीर्याने सांगत आहे, की निवडणूक आयोगात बसून जो कोणी हे काम करत आहे तो देशाविरुद्ध काम करत आहे.
वरपासून खालपर्यंत, कोणीही असो, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत असल्याने आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही. हा देशद्रोह आहे, तुम्ही कुठेही असाल, निवृत्त असो किंवा काहीही असो, आम्ही तुम्हाला शोधून काढू.. असं म्हणत राहुल गांधींनी चॅलेंजच दिलं आहे.
निवडणूक आयोग काय म्हटलं?
राहुल गांधी यांचे आरोप बेजबाबदार आणि बिनबुडाचे आहेत. त्यामु्ळे आम्ही या आरोपांकडे लक्ष देत नाही. अशा वक्तव्यांकडे लक्ष न देता निष्पक्षपणे कामकाज सुरू ठेवा अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असे निवडणूक आयोगाने ट्विट करत सांगितले. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. रोजच होत असलेल्या अशा बेजबाबदार आणि बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं ते म्हणालेत.