Rahul Gandhi VS Devendra Fadanvis : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) होऊन सहा महिने झालेत. महायुतीचे सरकार स्थापन झालंय. तरीही विधानसभेतील वाढलेल्या मतदारसंख्येवरून महायुती व महाविकास आघाडीमधील वाद पेटलेलाच आहे. काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक लेख लिहित या वादाला पुन्हा फोडणी दिलीय. राहुल गांधी यांनी वाढलेली मतदारसंख्या, निवडणूक आयोगाचे सदस्य वाढविणे, निवडणूक आयोगावर थेट आक्षेप घेत पाच मुद्द्यांचा लेख शनिवारी लिहिला होता. त्याता आता मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी पाच मुद्द्यांचाच लेख लिहित राहुल गांधींचे दावेच फेटाळून लावलेत.
निवडणूक आयुक्त निवडीवरून काँग्रेसला घेरले
भारत निवडणूक आयोगावरील सदस्य निवडीला राहुल गांधींचा आक्षेपाचा पहिला मुद्दा होता. सरन्यायाधीशांएेवजी केंद्रीय मंत्री निवड समितीत घेतले. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आतापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्त केंद्राने थेट नेमले. पहिल्यांदा मोदी यांनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. पण लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही, असे फडणवीस यांनी लेखात टोलाही लगावलाय.
मतदारसंख्यावाढीचा आक्षेप आकडे देवूनच खोडला
राहुल गांधींचा दुसरा आक्षेप मतदारसंख्यावाढीचा आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस लेखात म्हणतात, वाढलेल्या मतदारसंख्येला ते बोगस मतदार म्हणतात. 5 वर्षांत 31 लाख मतदार वाढले. हा त्यांचा आक्षेप आहे. पुढे 5 महिन्यांत 41 लाख मतदार वाढले, असेही ते म्हणतात. युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते. या 40 लाख 81 हजार 229 मतदारांपैकी 26 लाख 46 हजार 608 मतदार हे युवा मतदार होते. नवीन मतदारांची नोंदणी, त्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग, त्यावरील सुनावणीची पद्धत याबाबत निवडणूक आयोगाने डिसेंबर 2024 रोजी आपल्या पक्षाच्या विधी, मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर 60 पानांचे पत्र पाठविले आहे, त्यात सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचले नसेल तर एकदा मागवून आवर्जून वाचावे. शिवाय जुनाही काही तपशील वाचावा. 2014 ते 2019 या काळात 63 लाख नवीन मतदार, 2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार, 2004 ते 2009 या काळात एक कोटी नवीन मतदार जोडले गेले आहेत. म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले, असे अजिबात नाही, हे आकडेवारी देवून फडणवीस यांनी राहुल गांधींचा मुद्दा खोडलाय. लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढलीय, याची आकडेवारी फडणवीस यांनी लेखात दिलीय. 2004 च्या लोकसभेपेक्षा विधानसभेत पाच टक्के अधिक. 2009 मध्ये चार टक्के अधिक, 2014 मध्ये तीन टक्के अधिक, 2019 मध्ये एक टक्का अधिक, 2024 मध्ये चार टक्के अधिक आहे. त्यामुळे पुन्हा 2024 मध्ये काहीही नवीन घडलेले नाही, असे फडणवीस यांनी म्हटलंय.
निवडणूक जिंकली म्हणून आकडे लपवू नका
मतदानाची टक्केवारी अचानक वाढली, हा तर फारच मोठा विनोद असल्याचे फडणवीस यांनी लेखात म्हटलंय. शेवटच्या तासात टक्केवारी कशी वाढली, हे समजून घ्यायचे असेल तर ताशी मतदान समजून घ्यावे लागेल. दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी 5.83 टक्के इतके मतदान झाले आहे. त्यामुळे शेवटच्या एक तासात 7.83 टक्के इतकी वाढ झाली, असे राहुल गांधी म्हणतात. पण सायंकाळी 5 ते 6 हीसुद्धा मतदानाची वेळ आहे आणि 6 पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो, ही बाब राहुल गांधींना माहिती नाही काय? असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय. यावरही एक सविस्तर लेख डिसेंबर 2024 रोजी लिहिण्यात आला होता. तोही वाचला असता, तर कदाचित इतका लेखनप्रपंच राहुल गांधी यांना आज करावा लागला नसता. असे काही महाराष्ट्रातच झाले नाही. 2024 च्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी 60.96 टक्के इतकी होती, जी दुसऱ्या दिवशी 66.71 टक्के इतकी अंतिम झाली. यातील वाढ 5.75 टक्के इतकी होती. पण, ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपवून ठेवणार का? आधी रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी यायची, आता ती पाच वाजता येऊन दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी येते, असे फडणवीस यांनी लेखात म्हटलंय.
कामठीच्या उदाहरणाला माढा, श्रीरामपूर मतदारसंघाचे उत्तर
राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, केवळ 85 मतदारसंघात 12 हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात गेल्या. सायंकाळी 6 नंतर झालेले मतदान हे 17 लाख 70 हजार 867 इतके आहे. दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार 1 लाख 427 मतदानकेंद्रांवर प्रतिमिनिट 97 हजार 103 इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जे मतदान सायंकाळी 6 नंतर झाले आहे, त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ 18 मिनिटे 23 सेकंद इतका आहे. ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदान टक्केवारीत वाढ झाली तेथे एनडीएच जिंकली, हे तर आणखी हास्यास्पद आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघाचे उदाहरण राहुल गांधी यांनी दिले. त्यालाही फडणवीसांनी उत्तर दिलंय. . माढ्यात 18 टक्के मतदार वाढ झाली. या मतदारसंघात शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला. वणीत 13 टक्के मतदानवाढ झाली. जेथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला. श्रीरामपूर येथे 12 टक्के मतदारवाढ जेथे काँग्रेस जिंकलीय.
राहुल गांधींकडून लोकशाही प्रक्रियेचा अपमान
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासंबंधी काही पुराव्यांचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर फडणवीस लिहिलात, निवडणूक आयोग यावर उत्तर देईलच. पण, मुख्य प्रश्न आहे, तो सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करण्याचा, सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचा. जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे. आपल्याच पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एक दिवसात भेट घेऊन दाखवा, अशी विधाने का करतात ? यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करून आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, कोणते विष कालवत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण, सातत्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, सामान्यजनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा, मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सेवक म्हणून मी कायम निषेधच करीन, असे शेवटी फडणवीस यांनी म्हटले आहे. तर बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणेही त्यांना आतापासून तयार करायची आहेत, हा भाग वेगळा, असा टोलाही फडणवीसांचा आहे.