Download App

बाळासाहेबांचा वारसा बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंचं ‘सिल्वर ओक’ला लोटांगण; शंभुराजेंचा घणाघात..

 Shambhuraje Desai On Uddhav Thackeray  : आजपर्यंत कुठलेही देशातले मोठे नेते ‘मातोश्री’वर येत होते, चर्चा व्हायच्या. मात्र, आज उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकला लोटांगण घालत गेले आहेत, अशी टीका शिवसेना नेते (शिंदे गट) आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना  उद्धव ठाकरे (ठाकरे) पक्षप्रमुख यांच्यावर केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल (ता.11 एप्रिल) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी अचानक भेट दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर (शिंदे) शिवसेनेकडून टीका केली जात आहे.

सकाळी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना. शिवसेनेचा मराठी बाणा, स्वाभिमान, बाळासाहेबांचा वारसा याची आठवण करून देणाऱ्या,उद्धव ठाकरेंवर ही वेळ आल्याची मनाला वेदना झाली, असा खोचक टोला देसाईंनी लगावला.

शंभूराज देसाईंची ठाकरेंवर खोचक टीका : म्हणाले, काका मला वाचवा…

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले, देशातल्या कुठल्याही मोठ्या चर्चेसाठी मातोश्री’वर अनेकांना यावं लागायचं पण आज मातोश्री’ला सिल्वर ओक’कडे जावे लागत आहे. ही वेळ उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत यांनी आणली आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक दरारा होता. शिवसेनेचा स्वाभिमान होता. एकीकडे इतका मोठा दराऱ्याचा वारसा आणि एकीकडे मातोश्री वरुन जाऊन सिल्वर ओक’ला लोटांगण घालण्याचा वारसा या दोघांमधला हा फरक असल्याचे म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचले.

महाविकास आघाडी मध्ये फूट पडायला सुरुवात झालेली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे अदाणी प्रकरणात एकीकडे संजय राऊत जेपीसी मागणी करतात, तर दुसरीकडे शरद पवार उच्च न्यायालयाच्या चौकशीची मागणी करतात, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेमध्ये मार्क, शिक्षण लिहा,असे राऊत म्हणतात, तर पवार शिक्षणावर बोलू नका असे म्हणतात, त्यामुळे आघाडीमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाल्याचेही देसाई म्हणाले.

Narhari Zirwal : पांढरा सदरा, गांधी टोपी आणि हिरवं लुगडं; जपान दौऱ्यापूर्वीचा झिरवळांचा लूक चर्चेत

दरम्यान, उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक’ ला गेल्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कट्टर शिवसैनिकांना खूप वेदना झाल्या आहेत. जी शिवसेना लाखो शिवसैनिकांच्या संघर्षाने आणि कधी कधी रक्ताने सांडून तयार झाली. त्या शिवसेनेला ही वेळ उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत यांनी आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

बाळासाहेब असताना युती सरकारचा रिमोट कंट्रोल हा त्यांच्या हातात होता. मात्र, महाविकास आघाडीचा रिमोट कंट्रोल हा शरद पवार यांच्याच हातात होता. तो बाळासाहेबांच्या वारसा सांगणाऱ्याने दिला आणि आज त्यांच्यावर तिथं जाऊन लोटांगण घालण्याची वेळ आली. आणि ही वेळ त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आणली आहे. काका मला वाचवा, असं म्हणत तर उद्धव ठाकरे गेले नाहीत ना?, असा प्रश्न आम्हाला पडतो, असा खोचक टोलाही शंभुराजेंनी लगावला.

देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मस्जिदमध्ये शिवसैनिक नव्हते. या विधानावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्याकडील माहिती अपुरी आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस आदेश द्यायचे, ते शिवसैनिक मानायचे. आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत की, बाबरी पाडण्यात शिवसेनेचा वाटा होता.

अजित पवारांनी आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी केली होती; शहाजी बापूंचा दावा

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गरजेनुसार माणसांचा वापर करून गरज संपल्यानंतर सोडून देतात. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. अयोध्या दौरांमध्ये आमच्यासोबत कुणी गुंड नव्हते. जे आदित्य ठाकरे सोबत होते. तेच आमच्या सोबत होते.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार लवकर होण्याची शक्यता सुद्धा देसाई यांनी व्यक्त केली. बच्चू कडू 2024 लाच मंत्री मंडळाचा विस्तार होईल असं म्हणतात, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारला असता त्यावर ते म्हणाले, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे की, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल.

त्याचबरोबर आमच्या संपर्कात अनेक राजकीय लोक आहेत. वेळ आल्यानंतर ते सुद्धा कळेल. भाजप-शिवसेना लोकसभा एकत्र लढणार आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. अडीच वर्षांमध्ये युतीमध्ये थोडीशी फूट पडली होती. ती आम्ही पुन्हा घट्ट बांधली आहे. आणि आमच्या जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस योग्य वेळी त्या त्या वेळेस घेतील तसेच आम्ही धनुष्यबाणावरच लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us