Download App

Kasba Bypoll : ‘मुक्ता टिळक यांच्यावर अन्याय’ तिकीट न मिळाल्याने भावूक होत शैलेश टिळक म्हणाले…

  • Written By: Last Updated:

पुणे: पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमदेवार देण्याऐवजी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून हेमंत रासणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आम्ही पक्षाकडे तिकीटाची मागणीही केली होती. पण तिकीट देण्यात आलं नाही. का दिलं नाही माहीत नाही? अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

कोणताही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एखाद्याच्या घरातील व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नैसर्गिकपणे उमेदवारी दिली जाते. भाजपने कसबा निवडणुकीच्या बाबतीत मात्र याला बगल देत हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे चिंचवड मध्ये मात्र लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.

तरीही पक्षासोबत राहणार

त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की “मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाला, असंही ते म्हणाले. तसेच आम्ही पक्षासोबतच राहू. काल देवेंद्र फडणवीस यांनी टिळक वाड्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी उमेदवारी देण्याबाबत काही निर्णय झाला नाही. दिल्लीतून निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं होतं.”

भाजप त्यांना सन्मानाचं स्थान देईल

काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की “शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पार्टी त्यांना सन्मानाचं स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत, असे सांगितले आहे.”

यावेळी बाकी कोणी उमेदवारी मागायला नको होती, पोटनिवडणूक होती. इतर लोकांनी समजून घ्यायला पाहिजे होत, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Tags

follow us