Download App

रस्ता आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं अन् शिव्या मी खातो; गडकरींची रस्त्यांच्या दुरावस्थेवरून नाराजी

रस्ता आमचा आहे, काम महाराष्ट्र सरकारचं आणि शंभर टक्के शिव्या मी खातो. त्यामुळे राज्य सरकारला तातडीने नोटीस पाठवा- नितीन गडकरी

  • Written By: Last Updated:

Nitin Gadkari : मुंबई-पुणे हायवे (Mumbai-Pune Highway), कल्याण-नगर रस्त्याच्या दुरावस्थेवरून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी राज्य सरकारला नोटीस पाठवण्याचे आदेश दिलेत. मुंबई-पुणे रोड आणि नगरच्या पुढील दोन टोल महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) घेतं, पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे रस्ता आमचा आहे, काम महाराष्ट्र सरकारचं आणि शंभर टक्के शिव्या मी खातो. त्यामुळे राज्य सरकारला तातडीने नोटीस पाठवा, हे रस्ते तातडीने दुरुस्त करायला सांगा, नाहीतर दोन्ही रस्ते ताब्यात घ्या, असे आदेश त्यांनी दिलेत.

माझ्या भाषणाची स्टाईल बदलवणारा मास्टर माईंड ‘नाना’; फडवीसांनी खुल्यामनानं सांगितलं… 

पुण्यातील एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास कंत्राट रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गडकरी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने आमच्याकडून दोन रस्ते घेतले. NH4 या रस्त्यावर अऩेक अपघात होतात. ज्यावेळी पाटणकर साहेब मंत्री होते, तेव्हा करंदीकर साहेब व्यवस्थापकीय संचालक होते. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. त्यावेळी ते माझ्याकडे आले. मुंबई-पुणे रोड हा नुकसानीत आहे, कर्ज वाढलेलं आहे, असं त्यांनी मला सांगितले. यातून मार्ग काढण्यासाठी पवार साहेबांनी मला तुमच्याकडे पाठवले आहे, असे करंदीकर यांनी मला सांगितले.

लाडू वादानंतर 34 हजार मंदिरांना नवा आदेश; कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय 

गडकरी म्हणाले, करंदीकर माझ्याकडे आले, त्यावेळी मी मंत्री नव्हतो. ज्याचं राज्य आहे, त्यांना बघू द्या, असं मी त्यांना म्हटलं. यानंतर मला शरद पवारांचा फोन आला. म्हणाले, नितीन, राज्यातलं सरकार जरी बदललं असलं तरी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हे तुझं अपत्य आहे आणि त्यासाठीचा उपाय तूच काढला पाहिजे.

पवार साहेबांचा फोन आल्यानंतर मी जुना मुंबई-पुणे महामार्ग एमएसआरडीसीकडे हस्तांतरित केला. त्या करारातील अटी अशा होत्या की, रस्त्यावरील सर्व पूल त्यांनी बांधले पाहिजेत. सगळ्या प्रकारे रस्ता चांगला ठेवला पाहिजे. पण आता त्यांनी हा रस्ता 8 हजार कोटींना विकला, पैसे घतेले. पण त्या रस्त्यावर ते कामच करत नाही. त्यामुळं आता तिथले आमदार तक्रारी घेऊन माझ्याकडे येतात.

राज्य सरकारला नोटीस पाठवणार…
पुढं गडकरी म्हणाले, त्यामुळेच मी आत्ताच माझ्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, महाराष्ट्र सरकारला नोटीस द्या. या रस्त्यांची तीन महिन्यांत दुरुस्ती झाली पाहिजे. मुंबई-पुणे रोड आणि नगरच्या पुढील दोन टोल महाराष्ट्र सरकार घेतं. पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे रस्ता आमचा आहे, काम महाराष्ट्र सरकारचं आणि शंभर टक्के शिव्या मी खातो. त्यामुळे आजच नोटीस पाठवा. हे रस्ते तातडीने दुरुस्त करा. नाही तर दोन्ही रस्ते ताब्यात घ्या आणि रस्त्यांचे काम करा, असे गडकरी म्हणाले.

follow us