पवना नदीचे पावित्र्य धोक्यात; जनावरांची चरबी-चामडे थेट नदीपात्रात फेकले

Pavana River- मोठ्या जनावरांची चरबी, चामडे तसेच मांसाचे गाठोडे थेट नदीपात्रात फेकले जात असल्याने नदी प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

Pravara River

Pravara River

पुणे: पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीचे (Pavana River) पावित्र्य धोक्यात आणणारा धक्कादायक प्रकार पुनावळे परिसरात उघडकीस आलाय. मोठ्या जनावरांची चरबी, चामडे तसेच मांसाचे गाठोडे थेट नदीपात्रात फेकले जात असल्याने नदी प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पुनावळे येथील काही ग्रामस्थांनी ही बाब भाजपचे (BJP) शहर उपाध्यक्ष राम वाकडकर (Ram Wakadkar) यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वाकडकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी शांताराम माने, पर्यावरण विभागाचे उपअभियंता पंकज धेंडे, कनिष्ठ अभियंता महेश धावरे, प्रोजेक्ट मॅनेजर राहुल वनवारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कुजलेली चरबी, चामडे आणि मांसाचे गाठोडे आढळून आल्याने उपस्थित सर्वांनाच धक्का बसला.

या प्रकारामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार या प्रकाराला पूर्णविराम देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी जालिंदर काटे, ज्ञानदेव काटे, हिरामण गवारे, आकाश रानवडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

याबाबतची माहिती कळताच तात्काळ आमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही तसेच उपद्रव शोधपथक तैनात केले आहे. हा प्रकार करणाऱ्या अज्ञात इसमांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सांगितेल.

नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच जलपर्णी हटवण्यासाठी रावेत बंधाऱ्यावर शुभम शिंदे या कंत्राटी सुपरवायझरच्या देखरेखीखाली काही कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला दररोज अशा घाणेरड्या प्रकाराला सामोरे जावे लागते. नदीपात्रातून दररोज पाच ते सहा गाठोडे बाहेर काढावी लागतात. मात्र नाईलाजाने हे काम करावे लागते.


मुंबई बंगळूरू महामार्गावरील पुलावरून हे गाठोडे

पवना नदीत टाकले जातात. त्यामुळे केवळ नदीचे पावित्र्यच नष्ट होत नाही, तर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. त्यामुळे या प्रकारामागील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.


फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी: वाकडकर

या प्रकाराची मी तीव्र नाराजी व्यक्त करतो महापालिकेच्या संबंधित विभागांनी समन्वय साधून या किळसवान्या प्रकारांना तात्काळ आळा घालावा, नदी प्रदूषित करणाऱ्यांवर आजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी केलीय.

Exit mobile version