पुणे: हिराबाग हाउसिंग सोसायटी येथील एसआरए प्रकल्पातील अस्वच्छतेचा प्रश्न अवघ्या चोवीस तासांत, नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर (Raghavendra Bappu Mankar) यांनी मार्गील लावला आहे. या इमारतीतील डक्टमध्ये साठणाऱ्या कचऱ्याला अटकाव करण्यासाठी संपूर्ण इमारतीत जाळ्या लावण्याच्या कामाला, आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने सुरुवात करण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यान या इमारतीतील रहिवाशांनी कचऱ्याची गंभीर समस्या बाप्पु मानकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. ही समस्या निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले होते. त्या अनुषंगाने काल त्यांनी प्रत्यक्ष सोसायटीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून संपूर्ण इमारतीत कचरा टाकण्याची जागा बंद करण्यासाठी जाळ्या लावण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, निर्णय झाल्यापासून चोवीस तासांच्या आत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील करण्यात आली आहे. या कामाची पाहणी करून, समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचा शब्द बाप्पु मानकर यांनी नागरिकांना दिला आहे.
या सोसायटीतील डक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठत असल्याने दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. ज्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वारंवार स्वच्छता करूनही पुन्हा कचरा साठत असल्याने, प्रत्येक मजल्यावर जाळ्या लावण्याची उपाययोजना करण्यात आली आहे.
सर्वप्रथम डक्टच्या संपूर्ण भागाची स्वच्छता करून घेण्यात आली आहे. इमारतीतील नऊ मजल्यांवर सहाशेहून अधिक जाळ्या बसवल्या जाणार आहेत. याचसोबत नागरिकांना डस्टबिनचे वाटप करून, ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. दिलेल्या शब्दाची त्वरित पूर्तता केल्याबद्दल रहिवाशांनी राघवेंद्र बाप्पु मानकर यांचे आभार मानले. यावेळी हिराबाग सोसायटीमधील शंकर तावरे, सचिन मुजुमले, संदीप गायकवाड, संतोष वाटमकर, पांडुरंग जावळकर, दत्ता इंगळे यांसह सोसायटीतील सदस्य व रहिवासी उपस्थित होते.
