Download App

Uday Samant: माफी मागताना प्रेक्षकांचे पैसे परत दिलेत का? उदय सामंतांनी भरत जाधवांना सुनावलं

Uday Samant On Bharat Jadhav: रत्नागिरीमधील नाट्यगृहामध्ये (Ratnagiri Theatre) आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत चाहत्यांची जाहीर माफी मागणारे अभिनेते भरत जाधव यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलेच सुनावले आहे. भरत जाधव यांनी या गोष्टीचे उगाच भांडवल केले आहे, त्याचा इव्हेंट करायचा की एपिसोड करायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असा खोचक टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

खरे तर उदय सामंत यांच्या पत्नी-अभिनेत्री नीलम शिर्के (Actress Neelam Shirke) या भारत जाधव (Bharat Jadhav) यांच्या सहकलाकार होते. ‘साहेब, बिबी आणि मी’ या सीरियलमध्ये त्यांनी भरत जाधव यांच्या बायकोची भूमिका साकारली होती.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

रत्नागिरीमधील नाट्यगृहामध्ये आपण पुन्हा पाय ठेवणार नाही. तसेच मी इकडे येणार नाही, मी तिकडे जाणार नाही, पण असं काही होत नाही आणि ते न आल्याने काय सांस्कृतिक चळवळ काही थांबणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी भरत जाधवांना सुनावलं आहे. 25 मे रोजी आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाविषयी माहिती देण्याकरता मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे बोलत होते.


ते पुढे म्हणाले आहे की, सावरकर नाट्यगृहामध्ये कोणत्या त्रुटी असणार तर त्या नक्की दूर केल्या जाणार आहेत. संयोजकांनी तीन तासाचे डिझेल टाकल्यावर ते ४ तास पुरूच शकत नाही. या कार्यक्रम किती वेळ चालवायचा हा संयोजकांचा महत्वाचा वाटा आहे. ज्यावेळेला आपण नाट्यगृहात शो करत असतो, त्यावेळेस तुम्हाला कुठेही जायची तयारी असावी लागते, अशा स्वरूपाचा एका नाट्यरसिकाचा लेख आपण वाचला असेलच.

आता वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये अतिशय चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. भरत जाधव यांच्या नाटकाच्या अगोदर ३ दिवस मी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांसोबत कार्यक्रमासाठी होतो. त्यावेळेला एसीचा कोणताही त्रास आम्हाला झाला नाही. यामुळे त्यापेक्षा उगाच काहीतरी मोठे झाले आहे, असं करून आविर्भाव आणत दाखवणं हे योग्य नसल्याचे यावेळी उदय सामंत यांनी सुनावले आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

मी देखील सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहे, आपण या सगळ्या लोकांना अनेक वर्ष पाहत आहे. भरत जाधव मला कॉल करून बोलू शकले असते. आठवड्याअगोदरच बेंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये भरत जाधव माझ्याबरोबर होते. त्यासाठी त्यांना असा इव्हेंट करण्याची आवश्यकता नव्हती. पण तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे.

परंतु या सगळ्याची दखल नक्की घेण्यात येणार आहे, काही त्रुटी असल्यास त्या नक्कीच दूर केल्या जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली आहे. भरत जाधव यांनी माफी मागत असताना मला वाटलं त्यांनी चाहत्यांच्या तिकिटाचे काही पैसे परत दिले असणार, असा खोचक टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.

Tags

follow us