Download App

सहा महिन्यांत ६० हजार कोटी, बांग्लादेशच्या संकटात भारताची चांदी; कापड उद्योगाला बूस्टर..

Bangladesh Crisis : एखाद्याच्या संकटाचा फायदा दुसऱ्याला होतो. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपास घडत असतात. असंच काहीसं बांग्लादेश बाबतीत (Bangladesh Crisis) घडलं आहे. बांग्लादेशातील परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देश सोडल्यानंतर आणि येथे सत्तांतर झाल्यानंतर देशातील अनेक व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. देशातील व्यापार ठप्प झाला आहे. पण बांग्लादेशातील संकट भारतासाठी (India Bangladesh Relations) फायदेशीर ठरत आहे. जगभरात भारताचा दबदबा आधीच निर्माण झाला आहे. परंतु बांग्लादेशातील संकटामुळे आणखी मोठी संधी भारताला मिळाली आहे.

बांग्लादेशातील टेक्सटाइल इंडस्ट्री जगातील (Textile Industry) सर्वात मोठ्या इंडस्ट्रीपैकी एक होती. येथे तयार करण्यात येणारे कपडे भारतासह जगातील अनेक देशांत निर्यात केले जात होते. पण आता बांग्लादेशला नुकसान सहन करावे लागत आहे. तर भारताला फायदा होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार बांग्लादेशातील हिंसाचारानंतर भारतीय कापड उद्योगाने वेग घेतला आहे. फक्त सहा महिन्यांच्या काळात तब्बल 60 हजार कोटींची उलाढाल झाली आहे.

हिंमत असेल तर बांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ले रोखा; ठाकरेंचं मोदी-शहांना ओपन चॅलेंज !

बांग्लादेशातील संकटमुळे जगभरातील कापड खरेदीदार भारताकडे येत आहेत. या कारणामुळे भारताच्या कापड निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार जागतिक अनिश्चिततेच्या परिस्थितीतही 2024-25 या वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात कापड निर्यातीत 8.5 टक्के वाढ झाली. या काळात एकूण निर्यात 7.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 60 हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात रेडिमेड कपड्यांची निर्यात 17.3 टक्क्यांनी वाढून 1.11 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली.

बांग्लादेशचा कापड व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. परंतु देशातील संकटाच्या परिस्थितीत या व्यवसायाला मोठा फटका बसताना दिसत आहे. मागील आकडेवारी पाहिली तर बांग्लादेशातून दर महिन्याला 3.5 ते 3.8 अब्ज डॉलर्स किमतीचे कापड निर्यात केले जात होते. युरोपियन युनियन ते युकेपर्यंत विविध देशांत बांग्लादेशातील कापड निर्यात केले जात होते.

भारताची चांदी; सहा महिन्यांत 60 हजार कोटी

बांग्लादेशच्या संकटाचा थेट फायदा भारताला होत आहे. मागील सहा महिन्यांच्या काळातील घडामोडींचा विचार केला तर कापड इंडस्ट्रीपासून भारताला मोठा फायदा झाला आहे. बांग्लादेशातील संकट पाहता जगभरातील कापड खरेदीदार भारताला ऑर्डर देत आहेत. अशा परिस्थितीत भारत याचा फायदा घेऊ शकतो. आपल्या निर्यातीच्या क्षमतेत आणखी वाढ करू शकतो. बांग्लादेशात ज्या भारतीयांचे मॅन्यूफॅक्चरिंग युनिट आहे ते पुन्हा भारतात शिफ्ट होऊ शकतात. यामुळे देशाच्या उत्पन्नात वाढ होईलच शिवाय देशात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.

हिंसाचाराचा इफेक्ट! बांग्लादेशचा कापड उद्योग गडगडला, 4500 कोटी पाण्यात, 900 कारखाने बंद..

साडेचार हजार कोटी पाण्यात

देशात जवळपास दोन महिने सरकार विरोधात निदर्शने आंदोलने सुरू होती. या अशांत वातावरणाचा फटका कारखान्यांना बसला. याचा परिणाम म्हणून आर्थिक उलाढाल कमी झाली. बांग्लादेश गारमेंट्स मॅन्यूफॅक्चर्स अँड एक्स्पोर्टस असोसिएशनने (बीजीएमई) ऑगस्ट महिन्यात एक रिपोर्ट जारी केला होता. यामध्ये बंद आणि दळणवळण व्यवस्था बाधित झाल्याने 6400 कोटी टका (जवळपास 4500 कोटी रुपये) इतके नुकसान झाल्याचे सांगितले गेले होते.

follow us