Pakistan Condemns US Strikes On Iran : इराण आणि इस्रायलमध्ये (Iran and Israel War) सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेनेही (America) उडी घेतली आहे. आज सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आता यावर जगातील विविध देशांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता पाकिस्तानने रविवारी अमेरिकेने या अणु प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. या हल्ल्यांद्वारे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केलं असून इराणला स्वसंरक्षणाचा हक्क असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने 65 वर्षीय वृद्धाला चिरडलं
— Ishaq Dar (@MIshaqDar50) June 22, 2025
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले होते. यानंतर आता हे विधान करण्यात आलं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटलंय की, इस्रायलच्या हल्ल्यांच्या मालिकेनंतर इराणी अणु प्रकल्पांवर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांचा पाकिस्तान निषेध करतो. या प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याच्या शक्यतेमुळं आम्ही चिंतेत आहोत, असं त्यांनी म्हटलं.
पश्चिम अशियातील वाढता तणाव अत्यंत विचलित करणारा असल्याचं तसंच या तणावात आणखी वाढ झाल्यास या प्रदेशासाठी आणि त्याच्याही पलीकडे याचे गंभीर हानिकारक परिणाम होतील, असं पाकने म्हटलं.
नागरिकांच्या जीविताचा आणि त्यांच्या मालमत्तेचा आदर करण्याची आणि संघर्ष तात्काळ थांबवण्याची गरज आम्ही अधोरेखित करतो. सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे, विशेषतः आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानसाठी लाजिरवाणी बाब
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. तसंच पाकिस्तानच्या वतीने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात यावा, असंही त्यांनी सूचवलं होतं. पण, या भेटीनंतर काही दिवसांतच अमेरिकेने रविवारी पाकिस्तानचा मित्र इराणवर हल्ला केला. त्यामुळे हे एकप्रकारे पाकिस्तानसाठी लाजिरवाणे ठरले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गुटेरेस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. याचा नागरिकांसाठी, प्रदेशासाठी आणि जगासाठी विनाशकारी परिणाम होऊ शकतो. मी देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन करतो.