Download App

वणवा पेटण्यास सुरूवात, राजसाहेबांचा विजय असो; हिंदी सक्तीविरोधात भाजपात पहिला राजीनामा

Resignation Over Compulsion of Hindi In BJP: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करत हिंदी सक्तीविरोधात दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई शहराध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी सोशल मीडियावर एक वेगळाच दावा करत भाजपला डिवचलं आहे.

गजानन काळे यांनी राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावर टीका करत भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने या निर्णयाच्या निषेधार्थ राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर, “हिंदी सक्तीच्या विरोधात भाजपमधील पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. भाजपमधील अनेकांना हा निर्णय मान्य नाही. भाजपमधील स्वाभिमानी मराठी पदाधिकाऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे,” असे आवाहन केले आहे.

संजय राऊतांचं सूचक ट्विट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित असलेला फोटो ट्विट करून त्यात एकच मोर्चा निघेल, असं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे हे ब्रँड आहेत! महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र, असं संजय राऊतांनी म्हटलंय. राजकीय गोटात संजय राऊत यांचं ट्विट सूचक असल्याचं बोललं जात आहे. यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच संजय राऊतांच्या या ट्विटमुळे आणखी जास्त लक्ष वेधलं गेलं आहे.

महाराष्ट्र द्रोहींचा प्रचंड जळफळाट

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे ट्विट बघून महाराष्ट्र द्रोहींचा प्रचंड जळफळाट झाला असेल. कुटुंब एकत्र येत असेल तर स्वागतच, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

गिरगाव चौपाटीवरून मोठा मोर्चा

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मोठा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठी माणसाचा मोर्चा असेल, असे स्पष्ट करण्यात आलं आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, खेळाडू, साहित्यिक, वकील यांना सहभागी व्हा, असं आवाहन देखील ठाकरे यांनी केलंय. महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा कट उध्वस्त करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन त्यांनी केलंय.

follow us