Download App

शरद पौर्णिमेदिवशी चंद्राचे प्रतिबिंब दुधात पडण्याला इतके महत्त्व का? जाणून घ्या सविस्तर…

हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला (Sharad Pournima) विशेष महत्त्व प्राप्त आहे. शरद पौर्णिमेचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हंटले जाते. याच शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे. हा दिवस इतका शुभ आणि सकारात्मक आहे की लहान सहान उपाय केल्याने सुध्दा अनेक मोठमोठ्या गोष्टी मार्गी लागतात. (Why is the moon’s reflection in milk so important on Sharad Full moon day)

कोजागिरी पौर्णिमा का म्हटले जाते?

शरद पौर्णिमेच्या दिवशी कोजागरी व्रत करून लक्ष्मीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, ‘या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फेरफटका मारते आणि विचारते की कोण जागे आहे?’

शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळे देशाच्या अनेक भागात शरद पौर्णिमेला लक्ष्मीपूजन केले जाते.

पौर्णिमा केव्हाही सुरू झाली तरी लक्ष्मीची पूजा दुपारी 12 नंतरच केली जाते.

लक्ष्मीजींच्या मूर्तीशिवाय कलश, धूप, दुर्वा, कमळाचे फूल, हरतकी, कावळी, आरी (छोटी वाटी), भात, सिंदूर, नारळाचे लाडू हे पूजेत महत्त्वाचे आहेत. पूजेच्या पद्धतीचा विचार केला तर त्यात रांगोळी आणि घुबडाच्या आवाजाला विशेष स्थान आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या दुधाचे महत्त्व :

असे म्हणतात की, शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी वाढते. तसेच चंद्राला अर्ध्य अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्रदोष नाहीस होतो. त्यामुळेच या दिवशी दूध किंवा खीर तयार करून त्यामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब पाहण्याला विशेष महत्त्व आहे. कारण हे दूध किंवा खीर खुल्या आकाशाखाली ठेवल्यास त्यात अमृत गुणधर्म असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राची किरणे पडतात आणि ते दूध अमृतासारखे फलदायी होते.
त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध तयार करून त्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडल्यानंतरच ते सेवन करावे.

कुमार पौर्णिमा –

द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या अद्भूत रासलीलेची सुरुवात देखील शरद पौर्णिमेच्या दिवशीच झाल्याचे मानले जाते.

शैव भक्तांसाठी शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र कुमार कार्तिकेय यांचा जन्मही शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. या कारणास्तव याला कुमार पौर्णिमा असेही म्हणतात.

पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये या दिवशी अविवाहित मुली सकाळी स्नान करून सूर्य आणि चंद्राची पूजा करतात. असे मानले जाते की याद्वारे त्यांना योग्य पती मिळतो.

Tags

follow us