Stray Dog : भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ गल्ली-बोळापुरता राहिलेला नाही, तर तो थेट नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. राज्यभर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांनी नागरिक हैराण झाले असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्वानदंशाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ३ लाख २६ हजार ७८१ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर अहिल्यानगरचा हा आकडा मोठा असल्याने जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाची तीव्रता स्पष्ट झाली आहे.आरोग्य सेवा संचालनालयाकडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पारनेरचे माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकांत दराडे यांनी ही माहिती मिळवली आहे. राज्यात २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत तब्बल ४७ लाख ३७ हजार ७६३ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. याच कालावधीत ४ लाख ६६ हजार ३९२ नागरिकांना मांजरींनी, तर ४३ हजार ९५५ नागरिकांना माकडांनी चावा घेतल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. प्राण्यांच्या चाव्यांमुळे १३४ नागरिकांचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे.
अहिल्यानगरमध्ये दीड वर्षात सुमारे दीड लाख नागरिकांना कुत्र्यांनी घेतला चावा
अहिल्यानगरसाठी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांतील ३ लाख २६ हजार ७८१ श्वानदंशाच्या घटनांपैकी मागील दीड वर्षातच सुमारे दीड लाख नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.रस्ते, चौक, वसाहती, शाळा आणि बाजारपेठांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसते. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांवर कुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका कायम आहे. त्यामुळे श्वानदंशाच्या वाढत्या घटना प्रशासनाच्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
राज्यातील धक्कादायक आकडे
श्वानदंशाच्या घटनांमध्ये मुंबई ५ लाख २९ हजार ६५०, ठाणे ४ लाख ५ हजार ४३६, तर अहिल्यानगर ३ लाख २६ हजार ७८१ अशा घटना नोंदल्या गेल्या आहेत. त्याखालोखाल रायगड २ लाख ४३ हजार ६९३, पुणे २ लाख ३६ हजार १९२, नाशिक २ लाख १९ हजार ७१३, सातारा २ लाख १७ हजार ८४९, सोलापूर १ लाख ८३ हजार ९, पालघर १ लाख ५७ हजार ९१७ आणि जळगाव १ लाख ५७ हजार ८१९ अशी आकडेवारी आहे.
राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा ; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरातांची मागणी-
न्यायालयाचे आदेश; तरीही उपाययोजना कुठे गायब?
भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक उपाययोजना व नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्देशांनंतरही महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या पातळीवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकांत दराडे यांनी केला आहे.भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता ठोस कृती करण्याची गरज आहे. नागरिकांवर हल्ले होऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा सवालही या आकडेवारीमुळे उपस्थित झाला आहे.न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांविरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे कमलाकांत दराडे यांनी सांगितले आहे.
