बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावून देणारी (Beed) एक मोठी टोळी सक्रिय झाली असून, या टोळीने ग्रामीण भागातील अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर आला असून, एकाच तरुणीने चक्क नऊ वेळा लग्नाचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. या टोळीने पैशांच्या हव्यासापोटी एकाच मुलीचे यापूर्वी आठ वेगवेगळ्या नवरदेवांसोबत लग्ने लावून दिली होती आणि आता नवव्यांदा उमापूर येथील एका तरुणासोबत तिचे लग्न लावून त्याला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
या प्रकारामुळे पीडित नवरदेवावर आता ‘नवरी एक आणि नवरदेव अनेक’ असे म्हणण्याची वेळ आली असून, फसवणुकीच्या या मोठ्या जाळ्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उमापूर येथील पीडित तरुणाची फसवणूक करण्यासाठी या बोगस टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचला होता. एजंटच्या माध्यमातून या तरुणाचे लग्न संबंधित मुलीशी लावून देण्यात आले, मात्र लग्नानंतर काही काळातच या नवरीचे खरे रूप समोर आले. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, या तरुणीने याआधीच आठ जणांशी लग्ने करून त्यांना लुटले होते आणि उमापूरचा हा तरुण तिचा नववा शिकार ठरला आहे.
बीड जिल्ह्यात ऊसतोडणी कामगारांचं सर्वेक्षण; किती आहेत एकूण कामगार?
पैशांच्या लालसेपोटी एजंट आणि ही तरुणी संगनमताने तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. या टोळीने केवळ आर्थिक लूटच केली नाही, तर तरुणांच्या भावनांशी खेळून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या भीषण फसवणुकीनंतर पीडित तरुणाने बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे, मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहून त्याने थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
आपल्या निवेदनामध्ये तरुणाने अत्यंत भावनिक होऊन म्हटले आहे की, या टोळीने माझी लाखो रुपयांची फसवणूक केली असून, एकाच मुलीचे यापूर्वी आठ वेळा लग्न लावून देण्यात आले होते हे समजल्यानंतर मला मोठा धक्का बसला आहे. या फसवणुकीमुळे मी इतका खचलो आहे की माझ्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असेही त्याने निवेदनात नमूद केले आहे. आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि या बोगस टोळीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी या तरुणाने पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा बोगस लग्नांच्या टोळ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. अनेक तरुण लग्नासाठी उत्सुक असताना एजंट त्यांना गाठतात आणि फसव्या मुलींशी त्यांचे लग्न लावून देऊन पैसे घेऊन पसार होतात. उमापूरच्या या तरुणाने मांडलेली कैफियत ही जिल्ह्यातील अनेक तरुणांच्या व्यथेचे प्रतिनिधित्व करत आहे. पोलीस आता या टोळीचा सखोल तपास करत असून, यामागे आणखी किती जणांचे हात आहेत आणि या तरुणीने आणखी किती तरुणांना लुटले आहे, याचा शोध घेतला जात आहे.
