Kishore Kadam : गेल्या पस्तीत वर्षांपासून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम (Kishore Kadam) सध्या चर्चेत आले आहे. किशोर कदम यांना कवी सौमित्र म्हणूनही देखील ओळखले जाते. तसेच किशोर कदम यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मात्र यंदा ते त्यांच्या कामामुळे नाहीतर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांचा मुंबईतील (Mumbai) राहत घर वाचवण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील राहत घर धोक्यात असल्याची माहिती किशोर कदम यांनी फेसबुक पोस्टमध्ये दिली आहे. तसेच त्यांनी या पोस्टमध्ये कमिटी मेम्बर्सकडून २३ जणांची फसवणूक होत असल्याची माहिती दिली आहे.
अभिनेते किशोर कदम यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, नमस्कार ! मी किशोर कदम. गेली तीस पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते ,मंत्री ,मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे.
मेजॉरिटीच्या नावा खाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये,रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र , अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे.
कमिटी चौकस नसेल , सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहत नसेल , PMC आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्प सारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे आमची (अंधेरी हवा मेहेल सोसायटी चाकाला मुंबई 400093) सोसायटी आहे. मुर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत , कायद्याला धरून आवाज उठवतात , अन्याया विरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे.
एखादा सभासद जर चौकस असेल , कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील , कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा WTSAP ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबई सारख्या शहरात चक्क बायकॉट केले जाते , त्याच्या पासून सगळी महत्वाची माहिती लपवली जाते , त्याच्या विरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते ,त्याला एकटे पाडले जाते. ही एका प्रकारची शहरी एट्रोसिटीच असते ज्या साठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.मुंबई सारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्या नंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत.
संसदेत नवीन आयकर विधेयक मंजूर; सर्वसामान्य नागरिकांवर काय होणार परिणाम?
या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती ,मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यममंत्री फडणवीसजी , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी , तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे.
किशोर कदम.
कवी सौमित्र.