Download App

श्रीकांत शिंदे ते अनुराधा पौडवाल : इर्शाळवाडीला पुन्हा उभं करण्यासाठी सरसावले हात…

रायगड : दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीला पुन्हा उभं करण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावू लागले आहेत. इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे.  या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे. सोबतच गायिका अनुराधा पौडवाल यांनी सर्व बाधित बांधवांना घर बांधून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर  ‘सिडको’च्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. (After the landslide, many helping hands have started reaching out to rebuild Irshalwadi)

श्रीकांत शिंदे फाँडेशनने घेतली शिक्षणाची जबाबदारी :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.

शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.

हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.

अनुराध पौडवाल देणार घर बांधून :

गायिका अनुराधा पौडवाल या स्वतःहून इर्शाळवाडीतील बाधित भागाची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी, माणुसकीच्या नात्याने सर्वांनी सढळ हाताने मदत करा. त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. जी काही थोडीफार मदत करु शकता ती करा. तुमचा मदतीचा एक हात तुम्ही पुढे करा” असं आवाहन केलं.  याशिवाय आपल्या  सर्वोदय फाउंडेशनमार्फत त्यांनी बाधितांना घर बांधून देणार असल्याचे सांगितले आहे. सरकारच्या पॉलिसीप्रमाणे जी काही मदत असेल ती करणार आहे. असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

सिडको करणार कायमच पुनर्वसन :

दरम्या, सिडकोमार्फत बाधित भागातील  नागरिकाचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. सध्यस्थितीत दुर्घटनाग्रस्त भागातील नागरिकांच्या तात्पुरत्या निवासासाठी 60 कंटेनर मागविण्यात आले आहेत.

Tags

follow us