Ahilyanagar Politics : नगर महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहे. गेल्या चोवीस तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे.
दोन्ही मनसे उमेदवार अचानक गायब झाल्याने अहिल्यानगर शहरातील अनेक चर्चांना उधाण आले आहे. केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केले आहे. दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पार्टी (BJP) आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर निवडणुकीला उभा होता अशी देखील माहिती सुमित वर्मा यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात मनसेचे पदाधिकारी यांनी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन सखोल तपासणीची मागणी केली आहे. दरम्यान अर्ज माघारी घेण्यासाठी उद्या 2 जानेवारी रोजी अंतिम दिवस असून त्यापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस 34 तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवत आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महायुती म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वबळावर अहिल्यानगर महापालिका निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
