भोंदू अशोक खरातनं सामान्यांपासून (Kharat) उद्योजकांचे फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आता खरातनं गारूड कसं घातलं, याचं वर्णन करणारं एका उद्योजकाचं पुस्तकच समोर आलं आहे. भोंदू खरातचे तत्कालीन भक्त असलेले सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी असा मी नामकर्ण हे आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी खरातला अद्भुत आणि चमत्कारिक पुरुषाचा दर्जा दिला.
2012 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात नामकर्ण यांनी खरातवर तब्बल 13 पानं खर्ची घातली आहेत. त्यातून खरातबद्दल अनेक गोष्टी समोर आल्याचं दिसतंय. नामकर्ण आवारे यांनी लिहिलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या आत्मचरित्रात अशोक खरात याच्याबाबत केलेल्या दाव्यांमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही पत्रकार परिषद घेत सिन्नरमधील एमआयडीसी आणि पतसंस्थांवर आरोप करत या प्रकरणात काही राजकीय संबंध असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता.
असा मी नामकर्ण या 2012 साली प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात पान क्रमांक 182 ते 194 मध्ये अशोक खरात यांच्याशी असलेल्या संबंधांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. सिद्ध पुरुषांच्या सहवासात या शीर्षकाखाली खरात यांच्यासोबतच्या अनुभवांचं वर्णन करण्यात आलं आहे.
पान नंबर 186 पॉइंटर
खरात साहेब जे बोलतात ते तसेच दिलेल्या वेळेत शंभर टक्के घडते त्यामुळे ही व्यक्ती सर्वसामान्य नाही काहीतरी आगळी वेगळी आहे हे मला मनोमन पटले आणि त्यानंतर खरात व मी एकमेकांच्या सानिध्यात नियमितपणे येऊ लागलो, असा उल्लेख देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.
पान नंबर 187 पॉइंटर
अद्भूत आणि चमत्कारिक अशा दोन-तीन प्रसंगांमुळे माझी पूर्ण खात्री झाली होती की खरात हा व्यक्ती सर्वसाधारण नाही तर ते सिद्ध पुरुष आहेत.
अशोक खरात यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील सुवर्ण विद्यापीठात शिक्षण घेऊन ब्रह्मांड शास्त्र (ओशिनॉलोजी) ही पदवी घेतली आहे. विशेष म्हणजे ही पदवी घेताना त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित देखील करण्यात आल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
पान नंबर 188 पॉइंटर
बीएससी पदवी संपादन केल्यानंतर सैनिकी विभागाचे शिक्षण पूर्ण केले, आणि त्यानंतर ब्रह्मांड शास्त्र पदवी मिळवली. विशेष म्हणजे या पुस्तकात ब्रह्मांड शास्त्र म्हणजे काय याचा देखील लेख लिहिला आहे. ब्रह्मांड शास्त्राला समुद्र शास्त्र म्हणून ओळखलं जात असल्याचा दावा देखील या पुस्तकातून करण्यात आला आहे.
पान नंबर 189 पॉइंटर
ब्रह्मांड शास्त्राचा प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर घरात यांचे गुरुवर्य मुजुमदार साहेब यांच्या प्रति आदरभावनेणे गुरुदक्षिणा म्हणून संकल्प केला होता. माझ्या आयुष्यात लॉर्ड शिवाच्या एकूण पाच सिद्ध मंदिराचे बांधकाम मी करणार आणि योग्यवेळी त्यापैकी एक भव्यसिद्ध मंदिर माझ्या गावच्या परिसरात बांधून जनकल्याणार्थ अर्पण करेल, या संकल्प पूर्तीसाठीच श्री शिवनिका संस्थान स्थापन करण्यात आलं आणि ईशानेश्वर मंदिराची निर्मिती झाल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
या आत्मचरित्राबाबत नामकर्ण आवारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. मात्र आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना त्यांनी या पुस्तक व लेखाबाबत माहिती दिली.
नामकर्ण आवारे म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांची निवडणूक त्यानंतर झालेला अपघात आणि त्यानंतर मला जे दोन-तीन अनुभव आले ते अनुभव या पुस्तकात मी लिहिले आहेत. माझ्या अनुभवांवर हे पुस्तक आधारित असलं तरी खरात याच्या शिक्षणाबाबत मी अधिकृत दावा केलेला नाही. अनेक वर्षे त्यांच्या सोबत राहिलो असल्याने ते मला जी माहिती व्यक्तिगत देत होते त्याच माहितीच्या आधारे मी या पुस्तकात ती मांडली. कोणत्याही व्यक्तींना त्याचं शिक्षण सांगितल्यावर आपण त्याच्याकडे डिग्री मागत नाही, त्या अनुषंगाने खरात यांनी मला त्यांचा शिक्षण प्रवास सांगितला होता. तोच मी पुस्तकात लिहिला. मी अनेक वर्षे त्यांच्या बरोबर होतो. मात्र 2023 मध्ये शिवनिका संस्थांनच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याच्या तीन वर्षा आधीपासूनच त्यांचा आणि माझा संपर्क नव्हता. ज्या उद्देशाने शिवनिका संस्थान उभारले गेलं तो उद्देश दिसत नसल्याने मी राजीनामा दिला. त्यांचा आणि माझा संबंध केवळ शिवनिका संस्थान आणि मंदिर इथपर्यंतच होता.”
चौकशीचा फास आवळणार?
एकीकडे भोंदू अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर येत असताना या आत्मचरित्रातील लेखामुळे पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. भोंदू अशोक खरात हा अशाच पद्धतीने लोकांना खोटी माहिती देऊन फसवत होता का हा प्रश्न देखील आता या पुस्तकाच्या लेखानंतर उभा राहिला आहे. 2012 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाबाबत आणि केलेल्या दाव्यांबाबत आता पोलीस देखील भोंदू अशोक खरातची चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
1999 साली पहिली भेट आणि भविष्यवाणी
तत्कालीन उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचाराचा काम नामकर्ण आवारे करत होते.
त्यावेळी प्रचारादरम्यान वाद झाल्याने सिन्नर पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचला आणि हा वाद मिटवण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असताना अशोक खरात पहिल्यांदा भेटले.
त्यावेळी पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर अशोक खरात यांनी स्वतःहून माझ्यासह इतर पाच सहा जणांना तुम्ही कोकाटे चे कार्यकर्ते आहात का हा प्रश्न केला.
त्याचवेळी ‘काही काळजी करू नका, माणिकराव साधारण 23 हजार 450 मतांनी निवडून येतील असं भविष्य आम्हाला सांगितलं.
मात्र विजयाचा जल्लोष करता येणार नाही कारण निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू होईल हे देखील त्यांनी सांगितलं.
यावेळी अशोक खरात यांनी आम्हाला सांगितलेल्या गोष्टी आम्ही लिहून घेतल्या व माणिकराव कोकाटे यांना देखील सांगितल्या.
त्यानंतर मतदान पार पडले आणि महिनाभरानंतर झालेल्या मतमोजणीत माणिकराव कोकाटे हे खरात यांना केलेल्या भविष्यवाणी प्रमाणेच 23, 450 मतांनी निवडून आले.
विशेष म्हणजे मतमोजणी होऊन परतत असताना शिंदे गावाजवळ दुर्घटना घडवून खरात यांनी सांगितल्याप्रमाणे दोन कार्यकर्त्यांचा जागेवर मृत्यू देखील झाला.
