महाराष्ट्रावर बर्ड फ्ल्यूचं मोठं संकट! लाखो कोंबड्यांसह अंडीही नष्ट करणार

नवापूर परिसरात एकूण 27 पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 12 लाख कोंबड्यांचे संगोपन केले जाते.

News Photo   2026 05 02T205837.285

News Photo 2026 05 02T205837.285

नंदुरबारच्या नवापूर परिसरात (Pune) पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोके वर काढले असून H5N1 विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासन आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. नवापूरमधील तीन पोल्ट्री फार्मचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तब्बल एक लाख 40 हजार कोंबड्यांच्या कलिंग प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच लाखो अंडी देखील नष्ट केली जाणार असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नवापूर परिसरात एकूण 27 पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 12 लाख कोंबड्यांचे संगोपन केले जाते. कोंबड्यांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. मात्र, सध्या सात पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग करण्यात येणार असल्याने चिंता वाढली आहे. या कोंबड्यांना पोत्यात भरून जमिनीत पुरले जात आहे. तसेच लाखो अंडीही नष्ट केली जात आहेत. सुरुवातीला बाधित पोल्ट्री फार्मचा पंचनामा करण्यात येत असून, त्यानंतर प्रत्येक कोंबडीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने कलिंग केले जात आहे.

पुण्यात संतापजनक प्रकार, महाराष्ट्र दिनी 65 वर्षीय व्यक्तीकडून 4 वर्षांच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या

नवापूरमधील डायमंड पोल्ट्री फार्ममध्ये 14 तारखेला अचानक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर नमुने भोपाल येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला आहे. ही संपूर्ण कलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे पाच दिवसांचा कालावधी लागणार असून यासाठी 25 पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच इतर जिल्ह्यांमधूनही मनुष्यबळ मागवण्यात आले आहे.

दरम्यान, इतर पोल्ट्री फार्ममधील नमुनेही तपासणीसाठी पाठवले जात आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असून, मोठ्या पक्षासाठी 140 रुपये, लहान पक्षासाठी 120 रुपये आणि प्रत्येक अंड्यासाठी 4 रुपये अशी भरपाई दिली जाणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला असताना दुसरीकडे मात्र धुळ्यात वाढलेल्या तापमानामुळे कोंबड्या मरण पावत आहेत. त्यामुळे या ठिकाणचा पोल्ट्री मालक संकटात सापडला आहे. धुळ्यात मोठ्या प्रमाणात तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत, प्रत्येक गावामध्ये पोल्ट्री चे फार्म असून त्यातून काही प्रमाणात उत्पन्न येतं, मात्र गेल्या महिन्याभरापासून तापमानाचा पारा वाढला आहे.

सध्या धुळ्याचे तापमान 42 अंश सेल्सिअस असून वाढलेल्या तापमानामुळे पोल्ट्री मधील दररोज 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होतो आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी ते निष्क्रिय ठरत आहे. त्यामुळे पोल्ट्री मालकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

Exit mobile version