आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेल्या आंब्यांचा संशय आल्याने विक्रेत्यांकडील आंब्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

News Photo   2026 05 23T170913.105

आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील (Mango) चार जणांचा कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर मृत्यू विषबाधा झाल्यानेच हा मृत्यू झाल्याचं पोलीस आणि फॉरेन्सिक तपासातून सत्य समोर आलं होत. आता, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील जायभाय कुटुंबातील सात जणांना आंब्याचा रस खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना घडली.

जायभाय कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते संबंधित कुटूंबीयांनी जे आंबे खाल्ले ते पिकवण्यासाठी ‘कॅल्शियम कार्बाइड’चा वापर केलेला असू शकतो, त्यामुळं ही घटना घडली असं डॉक्टर म्हणाले. आंबे खाऊन जेवणातील गोडवा जपण्याचं काम खवैय्यांकडून केलं जात आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने बाजारात विविध जातींचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

शेवगाव शहरातील आरे वस्तीवर राहणाऱ्या भाऊसाहेब जायभाय यांनीही बाजारातून आंबे खरेदी केले. कुटुंबातील सर्वांनी आंब्याचा रस खाल्ला, त्यानंतर जायभाय कुटुंबातील सात जणांना चक्कर येणे, तोल जाणे असा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी सुरुवातीला सर्वांना शेवगावमधील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, परंतु सर्वांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कलिंगड खाल्ल्याने मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! FDA च्या अहवालानंतर गुढ आणखी वाढलं

काही केमिकल्स पोटात गेल्याने अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो असे उपचार करणारे डॉ.सचिन पांडुळे यांनी सांगितले. दरम्यान, सात रुग्णापैकी सहा जणांना रुग्णालयातून वेगवेगळ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर अजूनही उपचार सुरू आहे, मात्र सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जायभाय कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते संबंधित कुटूंबीयांनी जे आंबे खाल्ले ते पिकवण्यासाठी ‘कॅल्शियम कार्बाइड’ चा वापर केलेला असू शकतो, असे सांगण्यात आले.

कॅल्शियम कार्बाइड ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर ‘एसिटिलीन’ नावाचा वायू सोडतो, जो माणसासाठी घातक ठरतो. अशा पध्दतीने ‘कॅल्शियम कार्बाइड’ वापरणे हे बेकायदेशीर आहे. संबंधित कुटुंबाला रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना जी लक्षण दिसत होती, त्यावरून एशियन हॉस्पिटलचे डॉ. सचिन पांडुळेंनी हा अंदाज बांधला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात केमिकलने पिकवलेले आंबे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचायत समिती आणि आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेल्या आंब्यांचा संशय आल्याने विक्रेत्यांकडील आंब्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेले आंबे पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. केमिकलने पिकवलेल्या आंब्यांमुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, आरोग्य विभागाने ही तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या तपासणी कारवाईनंतर पाथर्डी शहरातील फळविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Exit mobile version